Breaking

MLA Randhir Sawarkar : जिल्हा परिषदेतील भ्रष्टाचार पोहोचला विधानसभेत!

 

MLA attacks on corruption in Zilla Parishad : दलित वस्ती कामांतील अनियमिततेवरून आमदार आक्रमक

Akola जिल्हा परिषदेअंतर्गत दलितवस्तीच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत आमदार रणधीर सावरकर यांनी विधानसभेत सरकारला धारेवर धरले. चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा कलम २९३ अन्वये हा मुद्दा उपस्थित करत दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली.

आमदार सावरकर यांनी विधानसभेत सांगितले की, जाणून-बुजून दोन अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अनियमितता केली आहे. त्यामुळे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी तत्काळ कारवाई करावी, असा त्यांचा ठाम आग्रह आहे. जिल्हा नियोजन समितीच्या अंतर्गत ४१ कोटी रुपयांचा निधी दलितवस्तीच्या कामांसाठी मंजूर करण्यात आला. मात्र, या निधीच्या वाटपात मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचे लक्षात आल्यावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी यांनी या कामांवर स्थगनादेश दिला.

याप्रकरणावर नियोजन समितीच्या बैठकीत चर्चा झाली असता, जिल्हा परिषद बरखास्त होण्याच्या अवघ्या एक दिवस आधीच या कामांची मंजुरी देण्यात आल्याचे स्पष्ट झाले. “अधिकारी ५८ वर्षांपर्यंत सेवेत असतात. त्यांनी लोकप्रतिनिधींवर अवलंबून न राहता ग्रामीण भागातील समस्यांचे निवारण करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. नागरिक त्रस्त झाल्यावर लोकप्रतिनिधींकडे येतात. त्यामुळे अधिकाऱ्यांनी जबाबदारीची जाणीव ठेवून काम करायला हवे,” असे सावरकर यांनी ठणकावून सांगितले.

Randhir Sawarkar : सपकाळांची विधानं काँग्रेसच्या आकांना खूश करण्यासाठी!

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ही चूक झाल्याची कबुली प्रशासनाने दिली. त्यामुळे संबंधित कामांना स्थगिती मिळाली. पण ठमके आणि परिहार या अधिकाऱ्यांनी संगनमताने ही अनियमितता केली. आता सरकार या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करणार आहे की नाही? असा सवाल सावरकर यांनी केला. याच प्रकरणात उपमुख्य कार्यकारी अधिकारी परिहार यांना गटविकास अधिकाऱ्याच्या दर्जावरून उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदभार का व कसा देण्यात आला? याची चौकशी करावी, अशीही मागणी सावरकर यांनी केली.

MLA Randhir Sawarkar : शिवसेनेच्या मंत्र्याकडे असलेल्या खात्यात गैरव्यवहार, भाजप नेत्याचा आरोप

दलितवस्ती कामांतील भ्रष्टाचार आणि अनियमितता यासंदर्भात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आमदार सावरकर यांनी सभागृहात केली. “ठमके आणि परिहार या अधिकाऱ्यांनी संगनमताने कामांचे वाटप करून भ्रष्टाचार केला आहे,” असा गंभीर आरोप सावरकर यांनी केला. आता या प्रकरणावर सरकार काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.