Law and order situation in Amravati : पोलिसांचा धाक संपला, आमदारांचा विधान परिषदेत आरोप
Amravati शहरातील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाच्या निर्दयी हत्येचे पडसाद बुधवारी राज्य विधान परिषदेच्या पावसाळी अधिवेशनात उमटले. आमदार संजय खोडके यांनी या मुद्द्यावरून राज्य सरकारला जाब विचारत शहरातील ढासळलेल्या कायदा-सुव्यवस्थेवर तीव्र शब्दांत चिंता व्यक्त केली.
गृह विभागावरील पुरवणी मागणीवर चर्चा करताना आमदार खोडके म्हणाले, “शहरात एमडी ड्रग्ज, गांजा, गुटखा, अवैध दारू व सट्टा यांसारख्या अवैध धंद्यांना उधाण आले असून गुन्हेगारीचा आलेख सातत्याने वाढतो आहे. पोलिसांचा धाक उरलेला नाही. परिणामी मारहाणीपासून ते थेट पोलिस अधिकाऱ्याच्या हत्येपर्यंत घटना घडत आहेत. हे असेच चालू राहिले, तर अमरावतीमध्ये ‘माफिया राज’ येईल.”
शहरात २५ वर्षांपूर्वी पोलिस आयुक्तालयाची स्थापना झाली. सध्या १० पोलीस ठाण्यांतून कामकाज चालते. मात्र वाढत्या लोकसंख्येच्या आणि क्षेत्रफळाच्या तुलनेत दोन नवीन पोलीस ठाण्यांची गरज असल्याचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे, याकडेही खोडके यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
शहरात पोलिसांच्या कल्याणासाठी नवीन वसाहती उभारण्याची आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. मागील पाच वर्षांपासून गृह विभागाकडे प्रस्ताव प्रलंबित असून तो त्वरीत मंजूर करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
“शहरातील शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा व गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवावी. टवाळखोर आणि हुल्लडबाजांवर वचक ठेवणे आवश्यक आहे. शहरात चक्री जुगार, क्रिकेट बेटिंग आणि चोरीसारख्या घटनांत वाढ होत आहे. त्यामुळे पोलिसांनी बंदोबस्त आणि पेट्रोलिंग वाढवावे,” असेही आमदार खोडके यांनी स्पष्ट केले.
वाहतूक विभागाविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, “शहराच्या वाढत्या विस्तारामुळे वाहतूक कोंडीही नित्याची झाली आहे. मात्र पोलिसांचे लक्ष दंड वसुलीवर जास्त आहे. त्यामुळे वाहतुकीच्या व्यवस्थापनावर अधिक भर द्यावा.”