Shiv Sena chief Uddhav Thackeray and MNS chief Raj Thackeray will come together for Marathi language : अभिजात भाषेचा दर्जा साहित्य आणि समृद्धीमुळे मिळाला !
Mumbai : राज्य सरकारने पहिल्या वर्गापासून हिंदी भाषा सक्तीची केली. राज्यभरातून सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला जात आहे. या विरोधाच्या श्रृंखलेतील पुढची कडी म्हणजे ५ जुलैला मुंबईत मराठी माणसाचा गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे सहभागी होणार आहेत. पण या मोर्चाला कुठलाही राजकीय पक्ष नेतृत्व देणार नाही. या मोर्चात कुठल्याही पक्षाचा झेंडा असणार नाही, असे राज ठाकरे यांनी आधीच स्पष्ट केले आहे.
सद्यस्थितीत हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात काढण्यात येत असलेल्या मोर्चापेक्षाही जास्त चर्चा आहे ती, उद्धव आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याची. पण निश्चित कुणीही काहीही सांगू शकत नाहीये. दरम्यान मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी या मोर्चाच्या संदर्भात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा मराठी भाषेच्या समृद्धीमुळे, साहित्यामुळे आणि इतिहासामुळे मिळाला आहे. याचे श्रेय कुणीही घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
Hindi Language Conflict : हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधू एकत्र!
हिंदी भाषा सक्तीबाबत ४५० शिक्षण तज्ज्ञांची समिती नेमण्यात आली. या समितीने आपला ड्राफ्ट तयार केला. हा ड्राफ्ट ३८०० लोकांना देण्यात आला. त्यांनी याचा सखोल अभ्यास केल्यानंतर सांगितले की, हिंदी भाषा ही पहिल्या वर्गापासून शिकवली गेली पाहिजे. हा निर्णय कायदेशीर पद्धतीने घेतला आहे, असे मंत्री आशिष शेलार पत्रकार परिषदा घेऊन सांगत आहेत. या संदर्भात देशपांडे यांना प्रश्न विचारला असता, जेथे राज्यातील १२ कोटी जनता सांगत आहे की, पहिल्या वर्गापासून हिंदी भाषेची सक्ती नको, तेथे त्या ३८०० लोकांचं काय घेऊन बसलात? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.
हा विषय कायद्यात बसवा किंवा बसवू नका, त्याचे आम्हाला काहीही देणेघेणे नाही. पहिली ते पाचव्या वर्गापर्यंत हिंदी भाषेची सक्ती करू नये, या निर्णयावर आम्ही ठाम आहोत. सरकारने कायदा केला आणि हा कायदा मराठी भाषेच्या मुळावर येणार असेल तर आम्ही हा कायदा माननार नाही. या सक्तीला आमचा विरोध कालही होता, आजही आहे आणि भविष्यातही राहणार आहे, असे देशपांडे म्हणाले. ५ जुलैच्या मोर्चासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी स्वतः पुढाकार घेतला आहे, असेही संदीप देशपांडे यांनी सांगितले.