Municipal Corporation : NMCच्या स्वच्छता मोहिमेचा ‘कचरा’; सौंदर्यीकरणातील विलंबाविरोधात राष्ट्रवादीचा ‘हल्ला बोल’

NMC’s cleanliness drive ‘waste’; NCP’s ‘attack’ against delay in beautification : नागपूरचे आरोग्य धोक्यात, महानगरपालिकेच्या प्रशासनावर थेट आरोप

Nagpur : शहरातील स्वच्छता व्यवस्थेला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. नागपूर महानगरपालिकेने जाहीर केलेल्या ५० कचरा ठिकाणांच्या सौंदर्यीकरण कामात मोठ्या प्रमाणात विलंब होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (अजित पवार) केला आहे. याविरोधात आज (१९ नोव्हेंबर) दुपारी १२ वाजता सिव्हिल लाइन्स येथील महानगरपालिका प्रशासकीय इमारतीवर ‘हल्ला बोल मोर्चा’ काढण्यात येणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवक, महिला कार्यकर्त्या, युवक आणि मोठ्या संख्येने नागरिक या मोर्चात सहभागी होणार आहेत. महापालिका प्रशासनाविरोधात प्रखर निषेध नोंदवला जाणार आहे. शहराला कचराकुंडीत बदलणाऱ्या NMC ला जागे करा, ५० पैकी एकही प्रकल्प वेळेत पूर्ण होत नाही याला जबाबदार कोण, अशा घोषणा यावेळी देण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अनिल अहिरकर आणि कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर यांनी सांगितले.

Pune land scam : पार्थ पवार निर्दोष, सब-रजिस्ट्रारसह तिघांवर जबाबदारी

५० ठिकाणांच्या सौंदर्यीकरणाचे काम ठप्प..
महापालिकेने शहरातील ‘कचरा स्पॉट्स’ हटवून सौंदर्यीकरण करण्यासाठी ५० ठिकाणी प्रकल्प जाहीर केले. परंतु नागरिकांच्या तक्रारीनुसार अनेक ठिकाणी फक्त फलक लावण्यापलीकडे कोणतेही काम झालेले नाही. काही ठिकाणी काम सुरू झाले तरी ते अर्धवट सोडून देण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या विलंबामुळे शहरात कचऱ्याचे ढीगारे वाढत आहेत आणि दुर्गंधी पसरत आहे. परिणामी डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढला आहे.

सौंदर्यीकरणाऐवजी अस्वच्छतेचे नवीन हॉटस्पॉट..
स्वच्छता मोहिमेला फक्त कागदोपत्री महत्त्व दिले जात आहे. प्रत्यक्षात प्रशासन झोपलेले आहे. ५० ठिकाणांच्या सौंदर्यीकरणाचे काम वेळेत न केल्याने नागपूरच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहराला मिळणारे स्वच्छतेचे पुरस्कार आणि रँकिंग ही फक्त दिखाव्याची खेळी आहे, असा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. महापालिकेचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत; ठेकेदारांना संरक्षण देण्यात येत आहे. नागरिकांच्या पैशांचा अक्षरशः चुराडा केला जात असल्याचा आरोपही राष्ट्रवादी केला आहे.

Local Body Elections : तब्बल ३५ वर्षांनी सानंदा परिवार नगरपालिका निवडणुकीतून बाहेर

महानगरपालिकेला इशारा..
शहरातील सर्व ५० ठिकाणांची सद्यस्थिती तातडीने जाहीर करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी आहे. तसेच काम पूर्ण करण्यास विलंब करत असलेल्या ठेकेदारांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. NMC ने आता तरी जागे व्हावे. अन्यथा आम्ही पुढील काही दिवसांत आणखी मोठे आंदोलन उभारू, असा इशारा राष्ट्रवादी नेतृत्वाने दिला. नागपूर शहरातील स्वच्छतेची अवस्था आणि अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेविरोधात उभारलेला हा ‘हल्ला बोल’ मोर्चा नागरिकांच्या वाढत्या असंतोषाचे प्रतिबिंब मानला जात आहे.