Breaking

MVA to attack government: महविकास आघाडी सरकारविरोधात करणार हल्लाबोल!

आज महत्त्वाची बैठक, सरपंच घटनेवर भूमिका ठरणार

Nagpur बीड सरपंच हत्याकांडानंतर राज्यातील राजकारण तापले आहे. महाविकासआघाडीकडून कायदा व सुव्यवस्थेवरून हल्लाबोल करण्याची तयारी सुरू आहे. मंगळवारी मुंबईत महाविकासआघाडीची महत्त्वाची बैठक होणार आहे. त्यात तिन्ही महत्त्वाच्या घटकपक्षांचे नेते सहभागी होणार आहेत.

विधिमंडळ समितीवर निवडीसह अन्य विषयांवर यात चर्चा होणार असल्याचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले. नागपुरात ते बोलत होते. बदलापूरची घटना खऱ्या अर्थाने राज्याला काळिमा फासणारी होती. सरकारने पोसलेल्या भक्षकांना वाचवण्यासाठी प्रयत्न झाले. चौकशी अहवालात अनेक बाबी समोर आल्या आहेत, असं ते म्हणाले.

या प्रकरणातील सगळे तथ्य पुढे आणून, आरोपींवर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. नाशिकमध्ये मूकबधिर मुलावर अत्याचार झाला. महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था राहिली नाही. पोलिसांचा धाक राहिला नाही. गुन्हेगारांना रान मोकळे आहे. ६५ टक्के मंत्री गुन्हेगार प्रवृत्तीचे आहेत. त्यामुळे यांच्याकडून काय अपेक्षा करणार, असा सवाल त्यांनी केला.

उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. जयंत पाटील यांचा मला फोन आला. आता मंगळवारी सायंकाळी महाविकास आघाडीची बैठक होईल. आम्ही पुढील भूमिका त्यात ठरवू असे त्यांनी स्पष्ट केले. महायुती सरकारमध्ये वाद किती आहेत, खाते वाटप करायला वेळ गेला, पालकमंत्री देण्यासाठीही वाद झाला. एकीकडे मुख्यमंत्री १०० दिवसांत रिझल्ट द्यायचे म्हणतात. मुख्यमंत्री दावोसला गेले असताना नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदासाठी स्थगिती द्यावी लागली. या सरकारमध्ये आलबेल नाही. हे सरकार कुठल्या उंबरठ्यावर उभे आहे, वादविवाद की मलाईदार व्यवस्थेवर हे यातून स्पष्ट होते, अशी टीकादेखील त्यांनी केली.