Contractors fined Rs. 1 crore for not completing work on time : रस्त्याचे समतलीकरण केले नाही; एक कोटी रुपये भरण्याची शिक्षा
Nagpur नागपूर महानगरपालिकेचे काम संथगतीने चालते, ही बाब नवी नाही. पण विकासकामांसाठी नियुक्त कंत्राटदारांनाही ही सवय लागलेली आहे. पण त्यामुळे नागरिकांना त्रास होऊ लागला आहे. कंत्राटदारांची हिंमत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अश्यात तीन कंपन्यांना प्रत्येकी १ कोटी रुपयांचा दंड ठोकल्यामुळे इतर कंत्राटदारांना धडकी भरली आहे. महापालिकेच्या या कारवाईचा किती परिणाम होतो, ते येत्या काळात दिसेलच.
केंद्र सरकारच्या अमृत २ योजनेअंतर्गत मलनिःसारण वाहिनी बांधण्याचे कंत्राट तीन कंत्राटदारांना दिले होते. परंतु तीनही कंपन्यांनी वारंवार सूचना देऊन रस्ता समतलीकरणाचे काम पूर्ण न केल्याने लक्ष्मी सिव्हिल इंजिनिअरिंग सर्विसेस प्रा. लि., कलथिया इंजीनिअरिंग अँड कन्स्ट्रक्शन लि. व पी. दास इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. कंपन्यांवर १ कोटी रुपयांचा दंड महापालिकने ठोठावला आहे. या कंत्राटदारांनी सिवर लाइन टाकण्यासाठी रस्ते खोदले होते. परंतु, रस्त्याचे समतलीकरण वेळेवर केले नाही.
अमृत २ अंतर्गत शहरात ५३७ किलोमीटर लांबीची मलनिःसारण वाहिनी टाकण्याचे कंत्राट या कंपन्यांना दिले आहे. यापैकी १२५ किलोमीटर लांबीची मलनिःसारण वाहिनी टाकण्याचे काम या कंत्राटदारांनी केले. फेब्रुवारी महिन्यापासून महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागामार्फत वारंवार रस्ता पूर्ववत करण्याची कामे करण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. हे काम गांभीर्याने घेऊन पूर्ण करावे, यासंदर्भात महापालिकेतर्फे अनेकदा लेखी पत्रे कंपन्यांना दिलेली आहेत.
महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्वतः या संदर्भात दंड ठोठावण्याचा इशारा गेल्या २७ मे रोजी झालेल्या बैठकीत दिला होता. परंतु त्यानंतरही या कंपन्यांनी काम पूर्ण न केल्याने या कंपन्यांवर २५ लाख रुपये प्रतिनिविदा प्रमाणे १ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.