Congress has no objection to EVMs : विधानसभा निवडणुकीनंतर ईव्हीएमविरोधात केले होते आंदोलन
Nagpur विधानसभेचे निकाल जाहीर झाल्यानंतर ईव्हीएमवर काँग्रेसकडून शंका उपस्थित करण्यात आली होती. विरोधकांकडून विविध आरोप करण्यात आले होते. एवढेच नव्हे तर ईव्हीएमच्या विरोधात आंदोलनही झाले. मात्र आता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ईव्हीएमवर आपला आक्षेप नसल्याची भूमिका मांडली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध कयास वर्तविण्यात येत आहेत.
ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. काँग्रेसने वाढलेल्या मतदारसंख्येवर आक्षेप घेतला आहे. काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे मांडलेल्या भूमिकेनंतर ईव्हीएमवर आक्षेप घेतला नाही. वाढलेले मतदार आले कुठून हे स्पष्ट करावे. आम्ही निवडणूक आयोगाकडे मागणी केली तर भाजपच्या पोटात दुःखते. राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात महाराष्ट्र बदनाम होत आहे. दिवसाढवळ्या दरोडा टाकण्याचे काम होत आहे, यावर कुणी बोलायला तयार नाही, अशी टीका पटोलेंनी केली.
आम्ही स्वतः या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागणार आहोत, असे पटोले यांनी सांगितले. महाराष्ट्रात ओबीसींची परिस्थिती वाईट आहे. सातत्याने ओबीसींवर अत्याचार करत आहे. भाजप ओबीसी समाजाला टार्गेट करत आहे. यापूर्वी भुजबळ यांनी भूमिका मांडली. भुजबळ यांना कसे अपमानित केले ते पाहिले. या सर्व बाबी आम्ही देशाच्या जनतेच्या लक्षात आणून देणार आहोत, असंही पटोले म्हणाले.
Ideal Marriage : एक विवाह ऐसा भी! ना अंतरपाट-मंगलाष्टके, ना अक्षता!
क्रिमिलीयरची अट टाकून संवैधानिक आयोग नेमला. पण ओबीसींच्या मुलांसाठी हॉस्टेल नाही. यूपीएससी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समोर आलेली बाब गंभीर आहे. हा प्रश्न अधिवेशनात विचारू, असेही पटोले म्हणाले. मंत्रिमंडळातील ६५ टक्के मंत्री भ्रष्टाचारी आहेत. अनेकांवर गुन्हेगारी आणि बलात्काराचे आरोप आहेत. या मंत्रिमंडळाला बरखास्त केले पाहिजे. या सगळ्या मंत्र्यांबद्दल पुराव्यासहित माहिती मांडू, असा इशारा पटोले यांनी दिला.