Nana said, duplicate court order was issued, Chairman Narvekar said it is serious : मंत्री घाईत असतात तर कधी वरच्या सभागृहात, मग आमच्या प्रश्नांचं काय ?
Mumbai : पुण्याच्या सेशन कोर्टामध्ये एक घटना घडली. दोन कंपन्यांच्या भांडणात एका कंपनीने न्यायाशीशांची खोटी सही मारून आदेश काढला. चक्क बनावट आदेश काढण्यात आला. अशा पद्धतीने कुठलाही आरोपी स्वतःला वाचवू शकत असेल आणि कायद्याचे असे धिंडवडे काढले जात असेल, तर आपला उपयोग काय असा संतप्त सवाल काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केला.
यासंदर्भात आज (१७ मार्च) सभागृहात बोलत असताना नाना पटोले म्हणाले, अध्यक्ष राहुल नार्वेकर स्वतः वकील आहेत. त्यामुळे तातडीने दखल घेऊन या प्रकरणात कारवाई झाली पाहिजे. दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत आहेत. अशाच चोऱ्या वाढत आहेत तर मग पोलिस भरती कशासाठी घ्यायची? या राज्यात चाललंय काय, कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र, असाही सवाल त्यांनी केला.
Vijay Wadettiwar : वडेट्टीवार संतापले; म्हणाले, हमीभाव खड्ड्यात गेला का?
अध्यक्षांकडून आम्हाला अपेक्षा आहेत. पुण्यात घडलेली घटना अतिशय गंभीर आहे. आरोपीची येवढी हिंमत वाढलीच कशी, असाही प्रश्न पटोलेंनी उपस्थित केला. विधानसभेच्या कामकाजाबाबत ते म्हणाले, पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यातील आमचे प्रस्ताव अजूनही पेंडींग आहेत. मंत्र्यांना घाई असते, कधी ते वरच्या सभागृहात असतात. आमचं काय? जनतेच्या प्रश्नांचं काय? कामकाज समजावून सांगा. धोरण समजावून सांगाव, असेही ते म्हणाले.
नाना पटोलेंच्या पॉइंट ऑफ ऑर्डरवर अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, नानांनी माहिती दिली. कामकाजात अनियमितता असेल तर पॉइंट ऑफ ऑर्डर वापरता येतो. उद्या पेंडींग प्रस्वात क्लब करून घेतले जातील. कामकाजाच्या बाहेरील माहिती देऊन मागणी केली असेल तर आपण दिलेली माहिती गंभीर आहे. न्यायालयाच्या निकालाची खोटी प्रत काढणे, ही गंभीर बाब आहे. शासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि माहिती खरी निघाली तर संबंधित व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल करावा.