ncp-controversy-sunetra-pawar-parth-pawar-praful-patel-tatkare-row : सुनेत्रा पवारांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पुन्हा अंतर्गत वादाला तोंड फुटले असून वरिष्ठ नेत्यांबाबतच्या चर्चांनी राजकीय वातावरण तापले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिल्लीतील दौऱ्यात केलेल्या वक्तव्यामुळे या चर्चांना अधिकच उधाण आले आहे. त्यांनी कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर “ते कुठे आहेत, हे तुम्हालाच माहिती आहे, कधी येतात आणि कधी जातात,” अशी प्रतिक्रिया दिली.
या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले असताना खासदार पार्थ पवार यांनी पुढे येत या सर्व चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी सामाजिक माध्यमांवर स्पष्ट करताना प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याविरोधात पसरवल्या जाणाऱ्या बातम्या निराधार, तर्कहीन आणि काल्पनिक असल्याचे म्हटले आहे. तसेच या ज्येष्ठ नेत्यांचे योगदान आणि नेतृत्व आजही पक्षासाठी मार्गदर्शक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या दुसऱ्या गटाचे आमदार रोहित पवार यांनी गंभीर आरोप करत राजकीय वाद अधिकच चिघळवला आहे. त्यांच्या मते, अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या काही दिवसांत प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून पक्षाच्या घटनेत बदल करण्याची मागणी केली होती. या पत्राद्वारे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांना अधिक अधिकार देण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
रोहित पवार यांनी असा आरोपही केला की, या प्रक्रियेत पक्षातील प्रमुख नेत्यांना विश्वासात घेण्यात आले नव्हते. यानंतर सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवून त्या कालावधीत झालेला कोणताही पत्रव्यवहार अमान्य मानावा, अशी मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले.
Pune crime : विद्येचं माहेरघर ड्रग्सच्या विळख्यात; चक्क ‘पोर्टर’ ॲपवरून अंमली पदार्थांची विक्री
याशिवाय, अजित पवार यांच्या निधनापूर्वी काही संशयास्पद हालचाली झाल्याचा दावा करत रोहित पवार यांनी २७ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी प्रफुल पटेल यांचा पक्षाध्यक्ष म्हणून उल्लेख केल्याबाबतही त्यांनी शंका उपस्थित केली आहे.
या सर्व घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद पुन्हा उघड झाले असून आगामी काळात या वादाचा राजकीय परिणाम काय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
___








