Nitin Gadkari’s contribution to infrastructure development is huge : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते राज्यातील सात उड्डाणपूलांचे लोकार्पण
Nagpur पायाभूत सुविधांच्या विकासात महाराष्ट्र आता भारतात पहिल्या क्रमांकावर आहे. देशात सर्वाधिक पायाभूत विकासाची कामे आपल्या राज्यात सुरू आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका बाजूला केंद्र शासनाच्या मार्फत प्रकल्प हाती घेतले आहेत. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र शासनाने विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांच्या विकासात नितीन गडकरींचे योगदान मोठे आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राज्यातील विविध ठिकाणी महारेलने उभारलेल्या सात उड्डाणपुलांच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. Nagpur येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालय क्रीडा मैदान येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
पायाभूत सुविधांच्या विकासातून समृध्द महाराष्ट्र घडत आहे. येत्या काळात महारेल मार्फत 200 रेल्वे उड्डाणपूल व भुयारी मार्गाची कामे पूर्ण केली जात आहेत. मेट्रो, राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग, विमानतळ विकास, बंदरांचा विकास अशा सर्व क्षेत्रात राज्यात आपण दूरदृष्टी ठेवून विकास कामे हाती घेतली आहेत, असंही फडणवीस म्हणाले.
राज्याच्या समतोल विकासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यावर आम्ही सुरवातीपासूनच भर दिला आहे. सुरेश प्रभू रेल्वे मंत्री होते तेव्हा मी राज्याचा मुख्यमंत्री या जबाबदारीतून महाराष्ट्रातील रेल्वे उड्डाणपूल व इतर प्रकल्पाबाबत आग्रह धरला होता. राज्यात अत्यावश्यक असलेल्या रेल्वे उड्डाणपूल व भुयारी मार्गांची संख्या लक्षात घेता हे काम वेगाने पूर्ण होण्यासाठी एका कंपनीची नितांत आवश्यकता त्यावेळी भासली होती. वेळेत प्रकल्प पूर्ण व्हावेत यासाठी भारतीय रेल्वे व महाराष्ट्र शासन यांच्या सयुक्त सहभागातून महारेल ही स्वतंत्र कंपनी आपण स्थापन केली. एका वर्षात 25 उड्डाणपूल उभारण्याचा आदर्श महारेलने स्थापित करुन दाखवला. महारेलने त्यांच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविला आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
ज्या कामांचे आम्ही भूमिपूजन केले ती सर्व कामे प्रत्यक्षात दिलेल्या मुदतीत साकार करुन दाखवित आहोत. दळणवळण व सुलभ वाहतुकीच्या दृष्टीने राज्यात अनेक ठिकाणी रेल्वे उड्डाणपूल व भुयारीमार्ग आवश्यक आहेत. महारेल या कंपनीला दिलेली कामे त्यांनी कमी कालावधीत गुणवत्तापूर्ण ऊभारुन एक नवा मापदंड निर्माण केला असल्याचे ते म्हणाले. महारेलला यापुढे कामाची कमतरता भासणार नाही. आम्हाला वेग आणि गुणवत्ता याचा सुवर्णमध्य साधणारे अधिकारी व संस्था आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.