Breaking

Operation Sindoor : पठाणकोटमध्ये अकोटचे ४० नागरिक अडकले

 

40 citizens of Akot are in Pathankot : प्रशासनाकडून सावधगिरी बाळगण्याच्या सूचना

Akot भारत-पाकिस्तान सीमेवर सध्या तणावपूर्ण वातावरण आहे. काही भागांत प्रत्यक्ष युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पठाणकोट परिसरात ब्लॅक अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील अकोट येथून पर्यटनासाठी गेलेले सुमारे ४० नागरिक सध्या तिथे अडकले आहेत. त्यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या भागात युद्धजन्य स्थिती असल्यामुळे स्थानिक प्रशासनाकडून अत्यंत सावधगिरी बाळगण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.

अडकलेल्या नागरिकांमध्ये अकोटमधील विविध राजकीय, सामाजिक व व्यवसायिक क्षेत्रांतील व्यक्तींचा समावेश आहे. यात भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस प्रवीण डिक्कर, राष्ट्रवादी काँग्रेसचे सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर मानकर, सिव्हिल इंजिनिअर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष रवी पवार यांच्यासह चंदन चंडालीया, प्रवीण बानेरकर, संजय शेगोकार, परिक्षित बोचे, विठ्ठल डोबाळे, विशाल उपासे, सागर कोरडे, प्रवीण वाघ, गोपाल पाटील, अनिल तंवर आदींचा समावेश आहे.

Operation Sindoor : लष्कराने स्पष्ट केले ड्रोन हल्ल्याचे कारण !

यांच्यासोबत महिला, पुरुष तसेच लहान मुला-मुलींचाही समावेश असून, सर्वजण एका पर्यटनाच्या निमित्ताने उत्तर भारतात गेले होते. मात्र अचानक उद्भवलेल्या युद्धजन्य स्थितीमुळे त्यांना सुरक्षित स्थळी हलविणे अवघड झाले आहे.

पठाणकोटमध्ये ब्लॅक अर्लर्ट जारी झाल्याने मोबाईल नेटवर्क, इंटरनेट सेवा व वाहतूक व्यवस्था खंडित झाली आहे. नागरिकांना कोणतीही हालचाल न करण्याच्या तसेच वाहनांचे लाईट बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रात्रीच्या वेळी उजेड दिसू नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्यास सांगण्यात आले आहे.

Operation Sindoor : सामान्यांना इजा न होऊ देता मोडले दहशतवादाचे कंबरडे !

अकोटमधील नातेवाईक आणि प्रशासन सतत संपर्क साधून नागरिकांची माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अडकलेल्या नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने सुरक्षीत स्थळी थांबण्याचा निर्णय घेतला आहे. परिस्थिती पूर्णतः नियंत्रणात येईपर्यंत त्यांनी वाट पाहण्याचे ठरवले आहे.

या घटनेमुळे अकोट शहरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, अडकलेल्या नागरिकांच्या सुखरूप परताव्यासाठी नागरिक आणि प्रशासन प्रार्थना करत आहेत. जिल्हा प्रशासनाने संबंधित उच्च अधिकाऱ्यांशी संपर्क करून मदतीची मागणी केली आहे.