Congress supports every action of the Indian Army and the Central Government said Vijay Wadettiwar : भारत आपल्या नागरिकांवर हल्ले सहन करणार नाही
Nagpur : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्याची गरज होती आणि आज भारतीय सैन्याने त्यांना चांगलाच धडा शिकवला. यापूर्वीदेखील देशावर जेव्हा जेव्हा असे संकट आले, तेव्हा तेव्हा भारतीय सैन्याने पाकिस्तान्यांच्या घरात घुसून मारले आहे. आपल्या नागरिकांवरील हल्ले सहन केले जाणार नाही, हेच भारतीय सैन्याने दाखवून दिले आहे, असे काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.
ऑपरेशन सिंदूर राबवून भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या ९ अड्ड्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात अनेक दहशतवादीही ठार झाले आहेत. पहलगाम येथे निष्पाप नागरिकांना ठार मारणाऱ्या दहशतवाद्यांच्या विरोधात भारतीय सैन्याने केलेल्या कारवाईचे आम्ही अभिनंदन करतो. दहशतवादाच्या विरोधात भारतीय सैन्य आणि केंद्र सरकारकडून केल्या जाणाऱ्या प्रत्येक कारवाईला आमचा पाठींबा आहे, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.
पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधून भारतावर होणाऱ्या दहशतवादी कारवायांच्या विरोधात भारताने नेहमीच कठोर भूमिका घेतली आहे. कोणताही दहशतवाद भारत सहन करणार नाही, हाच संदेश आजच्या कारवाईतून देण्यात आला आहे. भारतीय सैन्याने दाखवलेल्या धैर्याचा आणि दृढनिश्चयाचा आम्हाला अभिमान आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.
पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या निष्पाप भारतीयांवर २२ एप्रिल रोजी भ्याड दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. त्यात भारतीयांनी आपल्या कुटुंबीयांना गमावले होते. त्यानंतरही त्यांनी जी हिंमत दाखवली, त्याचे कौतुक आहे. आज त्या दहशतवाद्यांना भारतीय सेनेने चोख उत्तर दिले असल्याचेही विजय वडेट्टीवार म्हणाले.