Politics is a means of creating happiness in the lives of the poor : पुण्याच्या युवा संसदेत झाला गौरव
Chandrapur : राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीत अनेक विक्रम करून विक्रमादित्य ठरलेले राज्याचे माजी वने सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अनेक पुरस्कारही पटकावले आहेत. पुणे येथे आठव्या युवा संसदेमध्ये काल (३० जानेवारी) मुनगंटीवार यांना आदर्श आमदार पुरस्काराने गौरवण्यात आले. यावेळी आमदार मुनगंटीवार यांनी विद्यार्थ्यांना राजकारणाचे महत्व पटवून दिले.
मंत्रीपदाच्या काळात राज्यात अनेक महत्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतले. राष्ट्रकुल संसदीय मंडळाचा उत्कृष्ट आमदार पुरस्कार, राज्याच्या आर्थिक प्रगतीमध्ये बहुमोल योगदान दिल्या बद्दल त्यांना इंडिया टुडे समूहातर्फे देशातील बेस्ट फायनान्स मिनीस्टर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आफ्टरनून व्हॉइस या वृत्त संस्थेतर्फे बेस्ट परफॉर्मिंग मिनिस्टर, लोकमतचा महाराष्ट्रीयन ऑफ द इयर, जेसीआय चा मॅन ऑफ द इयर अशा अनेक प्रतिषठेच्या पुरस्कारांनी सुधीर मुनगंटीवार यांना सन्मानित करण्यात आले आहे. वनमंत्रिपदाच्या काळातील त्यांच्या पुढाकाराने झालेल्या विक्रमी वृक्ष लागवडीची नोंद गिनीज बुक तसेच लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे.
राजकारणाबद्दल अनेकांच्या मनात नकारात्मक भावना असतात आणि अनेकजण त्या उघडपणे व्यक्तही करतात. मात्र, राजकारण केवळ निवडणुकांपुरते मर्यादित नसून ते गोरगरीबांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे प्रभावी माध्यम आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
ते पुणे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स येथे आयोजित आठव्या युवा संसदमध्ये बोलत होते. यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार यांना ‘आदर्श आमदार पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. अशा पुरस्कारामुळे शंभरपट अधिक शक्तीने काम करण्याची ऊर्जा मिळते, अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री.चंद्रकांत पाटील, माजी केंद्रीय राज्यमंत्री राज्यसभा सदस्य भागवत कराड, खासदार अरविंद सावंत, आमदार सत्यजित देशमुख, आमदार अमित गोरखे आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी युवकांना अनेक उदाहरणे आणि कथांच्या संदर्भातून राजकारणाचे आणि त्यातील गांभीर्याचे महत्त्व पटवून दिले.
राजकारण म्हणजे निवडणूक हा चुकीचा समज आहे. राजकारण हे केवळ निवडणुकीपुरते मर्यादित नाही. राजकारणाचा उपयोग समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्यासाठी असावा असे आमदार मुनगंटीवार म्हणाले. देश बदलायला हवा, देश पुढे जायला हवा, असे प्रत्येकाला वाटते मात्र हे साध्य करण्यासाठी प्रत्येकाने पुढे येण्याची गरज आहे. राजकारण त्या परिवर्तनाची संधी देते, असे सांगताना त्यांनी अनेक उदाहरणे दिली. राजकारणातून अनेक चिरकाल परिवर्तनकारी कार्य करण्याची संधी मिळते. राजकारणात न जाण्याचा सल्ला देणे हा चुकीचा भ्रम आहे. गोरगरीब, शोषीत वंचितांचे मन जिंकण्याचे माध्यम म्हणजे राजकारण आहे, असेही ते म्हणाले.
युवा संसदेचे उत्तम आयोजन आणि नियोजनाबद्दल त्यांनी डॉ. सुधाकरराव जाधवर व शार्दुल जाधवर यांचे अभिनंदन केले. वनमंत्री असताना गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात गेल्याची आठवण आमदार मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितली. जनतेच्या हितासाठी कल्याणकारी निर्णय घेण्याचे कार्य राजकारणातून होते, असेही ते म्हणाले.