Punjabrao Deshmukh : पंजाबराव देशमुखांनी गहाण ठेवलेला वाडा होणार स्मृतिस्थळ!

अमरावती

Historical Wada to be Memorial Site : 126 व्या जयंती पर्वावर संस्थेने घेतला ऐतिहासिक निर्णय

दि. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या मालकीचा असणारा वाडा आता डॉ. पंजाबराव देशमुख याचं स्मृतिस्थळ होणार आहे. शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या 126 व्या जयंती पर्वावर बँकेने हा पुढाकार घेतला आहे. त्यामुळे एका विशिष्ट्य कारणासाठी पंजाबराव देशमुख यांनी एकेकाळी गहाण ठेवलेल्या वाड्याला आता ऐतिहासिक महत्त्व प्राप्त होणार आहे.

डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचा अमरावती Amravati शहरात मालटेकडीलगत टोपे नगर परिसरात वाडा आहे. या वाड्याचे स्मृतीस्थळ व्हावे, या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. डॉ. पंजाबराव देशमुख यांनी दी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेकडे वाडा गहाण ठेवला होता. पुढे त्यांच्या पत्नी विमलाबाई देशमुख यांनी अडचणीच्या काळात बँकेलाच वाडा विकला. दि. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेनं काही वर्ष या इमारतीत बँक चालवली. बँकेसाठी नवी इमारत उभारण्यात आली आहे. त्यामुळे भाऊसाहेबांचा वाडा जपण्याचा प्रयत्न बँकेच्या वतीनं करण्यात येत आहे.

देशाच्या स्वातंत्र्योत्तर काळात शिक्षणमंत्री असणारे डॉ. पंजाबराव देशमुख देश स्वतंत्र झाल्यावर देशाचे पहिले कृषिमंत्री झाले. 1958 ते 1959 दरम्यान डॉ. पंजाबराव देशमुख यांनी अमरावती शहरात सुमारे 33 हजार स्क्वेअर फुट जागा खरेदी करून त्या ठिकाणी दोन मजली वाडा बांधला. वाड्याच्या खालच्या मजल्यावर मोठी बैठक खोली, तीन शयन कक्षांसह छानशी स्वयंपाक खोली आणि टुमदार गॅलरी बांधली. वरच्या मजल्यावरचं बांधकामदेखील खालच्या मजल्याप्रमाणेच आहे. पूर्वी या वाड्यातून थेट मालटेकडी आणि मालटेकडी खालचा रस्ता दिसायचा. यासोबतच अमरावती मध्यवर्ती बस स्थानक आणि थेट आजचा गर्ल्स हायस्कूल चौक दिसायचा.

डॉ. पंजाबराव देशमुख यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेअंतर्गत विदर्भातील अनेक शाळा महाविद्यालय सुरळीत सुरू राहावेत या उद्देशानं त्याचा वाडा दि.महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेकडे गहाण ठेवला. 10 एप्रिल 1965 ला डॉ. पंजाबराव देशमुख यांचं निधन झालं. यानंतर या वाड्यात राहणाऱ्या त्यांच्या पत्नी विमलाबाई देशमुख यांना आर्थिक चणचण भासत होती. त्यांनी बँकेकडे गहाण असणारा हा वाडा बँकेलाच विकला. त्यावेळी बँकेचे अध्यक्ष देविदास बोबडे आणि माजी खासदार उषा चौधरी यांनी हा वाडा खरेदी करताना एक करार केला. “हा वाडा कधीही जमीनदोस्त केला जाणार नाही. डॉ. पंजाबराव देशमुख यांचे स्मृती स्थळ म्हणून इमारत कायम जपली जाईल, असा हा करार होता.

भाऊसाहेबांच्या स्मृतींचा ठेवा जपावा

ही वास्तू देशासाठी घेतलेल्या विधायक निर्णयाची साक्षीदार- “साधारण 75 ते 80 वर्षांपूर्वी डॉ. पंजाबराव देशमुख यांनी ही वास्तू उभारली असं लक्षात येतं. कृषिमंत्री या नात्यानं भाऊसाहेब याच ठिकाणी राहायचे. कृषिमंत्री म्हणून भाऊसाहेबांनी याच इमारतीतमधून विधायक निर्णय घेतले. त्यामुळे ही वास्तू अबाधित-सुरक्षित राहावी, अशी भावना अधिक मान्यवरांनी व्यक्त केली आहे.