Former MP Ramdas Tadas inaugurated the solar array : माजी खासदार रामदास तडस यांनी केले सोलर संचाचे उद्घाटन
Wardha : गाव तिथे सौर ऊर्जा, घर तिथे सौर ऊर्जा असणे आवश्यक आहे. सौर ऊर्जा ही काळाची गरज आहे, असे मत माजी खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केले. बोधिसत्त्व विद्यालय, अडेगाव येथील सोलर पॅनल सिस्टीमची पायाभरणी करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
अडेगाव येथील शाळेला इसाफ स्मॉल फायनान्स बँकेच्या सामाजिक दायित्व निधीमधून अंदाजे तीन लाख रुपये खर्चाच्या तरतुदीतून पाच केव्ही युनिट देण्यात आले. उद्घाटन माजी खासदार रामदास तडस, इसाफ स्मॉल फायनान्स बँकेचे उपाध्यक्ष जेम्स थॉमस, डी. एम. थूल यांच्या उपस्थितीत करण्यात आले. अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक मनीष थूल उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे म्हणून जार्ज थॉमस एक्झिक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट संजीव कुमार होटा, रिजनल हेड इसाफ, क्लस्टर हेड मनोज कुमार उपस्थित होते. संस्थेचे सचिव डी. एम. थूल, लंकेश बोरीकर, आशिष अवथे, सेलसुरा येथील गजानन मसाळकर आदींची मंचावर उपस्थिती होती. कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी तथा पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
या सौर ऊर्जाचा वापर विविध ठिकाणी होणार आहे. यामुळे विजेची बचत होऊन विद्युतपुरवठा खंडित न होता विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेचा व विविध विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा फायदा होणार आहे. याप्रसंगी इसाफ बँकेच्या अधिकाऱ्यांनी बँकेबाबत माहिती दिली. ही बँक समाजातील इतर घटकांकरिता शेती, शिक्षण, उपजीविका यासाठी काम करीत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
YDCC बँकेत काँग्रेसकडून काँग्रेस अध्यक्षांना होणाऱ्या विरोधाचा अर्थ काय ?
बँकेच्या सहकार्याने बचत गटांतील महिलांची झालेल्या प्रगतीबाबत आंबोडा येथील मंगला साठोने, तर पाथरी येथील वंदना चौधरी यांचा माजी खासदार रामदास तडस व पाहुण्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. इतरही महिलांना तथा शेतकऱ्यांना विविध उपक्रमांद्वारे शेती समृद्ध करण्याचे आवाहन करण्यात आले.
अडेगाव येथील शाळेला ४० वर्षे झाली आहेत. नऊ गावांतील मुले या शाळेत शिक्षण घेत आहेत. शाळेच्यावतीने चार गावांत बालज्योती क्लब काम करीत आहे. इसाफ बँकेकडून मिळालेल्या सोलर पॅनलमुळे वीज बचतीतील झालेल्या पैशांतून शाळेचा शैक्षणिक खर्च केला जाणार आहे, असे मुख्याध्यापक मनीष थूल यांनी सांगितले. प्रास्ताविक मानकर यांनी केले. संचालन मृणालिनी दातार यांनी केले. आभार मनीष खोडके यांनी मानले.