NCP MLA Rohit Pawar taunts BJP leaders over Operation Sindoor : पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत नसल्यामुळे आश्चर्य
Nagpur : भारत आणि पाकिस्तानध्ये युद्धादरम्यान जेव्हा शस्त्रसंधी झाली, तेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मध्ये बोलले. त्यामुळे भारताची खूप बदनामी झाली. अमेरिकेने व्यावहारिक धमकी दिली अन् भारताच्या पंतप्रधानांनी ती ऐकली. याचे देशवासीयांना वाईट वाटले. पण पंतप्रधान यावर काहीही बोलत नाहीत, याचे आश्चर्य वाटते. भाजपचे नेते ऑपरेशन सिंदूरचा एवढा उदोउदो करत आहेत की, जसे काही ते स्वतःच बंदुका घेऊन लढायला गेले होते, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) युवा आमदार रोहित पवार यांनी भाजप नेत्यांना डिवचले.
पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांच्या ठिकाणी आणखी कुणीही असतं तरी हेच घडलं असतं. आपला देश शत्रू देशासोबत लढत असताना पंतप्रधानांना पाठींबा देणे म्हणजे आपल्या सैन्याला पाठिंबा देणे असते. यावरून आपल्या देशात आपण वाद घालत बसलो तर त्याचा फायदा पाकिस्तानसारखा देश घेऊ शकतो. अशाच परिस्थितीत अटल बिहारी वाजपेयी यांनी इंदिरा गांधी यांना पाठिंबा दिला होता. शेतकरी, कष्टकऱ्यांचा जर विषय आला तर सुप्रिया सुळे पंतप्रधानांच्या विरोधातही जाऊन बोलतील, असे रोहित पवार यांनी सांगितले.
Ahamadabad plane crash : संजय गांधी ते माधवराव सिंधीया, विजय रुपाणी सह गमावले हे दिग्गज!
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या बाबतीत विचारले असता, नागपुरात काँग्रेस मोठा भाऊ आहे, तेथे आम्ही लहान भाऊ आहोत. मोठ्या भावाने लहान भावाला सांभाळून घेतले पाहिजे. काही जिल्ह्यांत आम्ही मोठा भाऊ आहोत, तेथे आम्ही त्यांना सांभाळून घेऊ. अशा पद्धतीने काम केले तरच कार्यकर्त्यांना न्याय मिळेल. शेवटी या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. आता नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची गरज आहे. स्थानिक पातळीवर त्या-त्या शहरांतील प्रमुखांना ही जबाबदारी द्यावी, अशाच पद्धतीने या निवडणुका लढल्या गेल्या पाहिजे, असे रोहित पवार यांनी सांगितले.