Serious allegations against Shirsat, Fadnavis had said to provide evidence : शिरसाटांवर गंभीर आरोप, फडणवीस म्हणाले होते पुरावे द्या
Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यावर थेट 5 हजार कोटींच्या जमीन घोटाळ्याचा गंभीर आरोप केला आहे. या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “असे आरोप रोज होतात, पुरावे द्या” असे आव्हान दिल्यानंतर रोहित पवार यांनी तब्बल 12 हजार पानांचे बॅगभर पुरावेच पत्रकार परिषदेत सोमवारी सादर केले. यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
रोहित पवार यांनी आरोप केला की, संजय शिरसाट हे सिडकोचे चेअरमन असताना मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाले. नवी मुंबईतील बिवलकर कुटुंबीयांना बेकायदेशीर पद्धतीने जमीन देण्यात आली आणि यात 5 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला. पवार म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी पुरावे द्या असे सांगितले होते. आज आम्ही त्यांच्यासमोर 12 हजार पानांचे पुरावे ठेवले आहेत. हे प्रकरण अतिशय गंभीर आहे आणि शिरसाट यांना तत्काळ पदावरून दूर करणे आवश्यक आहे.
रोहित पवारांनी सांगितले की, बिवलकर कुटुंबीयांचा अर्ज 1992 आणि 1995 मध्ये दोन वेळा फेटाळण्यात आला होता. कारण ते अंबसेंटी लँडलॉर्ड असल्यामुळे 12.5 टक्के योजनेचा त्यांना लाभ मिळू शकत नव्हता. हीच भूमिका सिडकोने स्पष्ट केली होती. मात्र 1 मार्च 2025 रोजी नगर विकास विभागाने बिवलकर यांना जमीन देण्याचे निर्देश दिले. ही प्रक्रिया न्यायालयीन सुनावणी सुरू असतानाच राबवली गेली. त्यामुळे हे पाऊल कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला.
पवार म्हणाले की, 48 तासांत 30 ते 32 टेबलवरून फाईल पुढे सरकली आणि तब्बल 5 हजार कोटींचे भूखंड वाटप झाले. साधारणपणे 12.5 टक्के जमीन वाटपाला वर्षानुवर्षे लागतात, पण या कुटुंबाची फाईल वायुवेगाने मंजूर झाली. बिवलकर यांनी मिळालेली जमीन पुढे बिल्डरांना विकली असून आता त्यावर मोठे संकट आले आहे. त्या बिल्डरांचे काय होणार? ही जमीन सरकार माघारी घेणार का? असा थेट सवाल त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना केला.
National Education Policy : शैक्षणिक धोरण उपयुक्त, मात्र अंमलबजावणीत अडचणी
पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी स्पष्ट केले की, “ट्रकभर नाही, गाडीभर नाही तर बॅगभर 12 हजार पानांचे पुरावे आम्ही दिले आहेत. शिरसाट यांचा तत्काळ राजीनामा घेतला नाही तर हा भ्रष्टाचार जनतेसमोर उघड करत राहू.” या घडामोडीनंतर राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली असून पुढे या प्रकरणाची चौकशी कोणत्या दिशेने जाते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.