Uddhav Thackeray Shivsena’s remaining leaders also to join shinde factor soon, sanjay Nirupam claims : मुख्यमंत्रिपदासाठी हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्या ठाकरेंना स्वतःचा पक्षही सांभाळता आला नाही, शिंदेंच्या नेत्याने डिवचले
Nagpur उद्धव ठाकरेंची शिवसेना आता केवळ माध्यमांपुरती उरली असून जमिनीवर तिचे अस्तित्व संपले आहे. ठाकरेंच्या निष्क्रियतेमुळे त्यांचे नेते गुदमरले असून, मुंबईतील मोजके खासदार सोडले तर उरलेले सर्व आमदार आणि खासदार आमच्या संपर्कात आहेत, असा खळबळजनक दावा शिवसेना (शिंदे गट) नेते संजय निरुपम यांनी आज नागपुरात केला.
राजकीय वर्तुळात सध्या ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा आहे. यावर भाष्य करताना निरुपम म्हणाले की, हे नाव पत्रकारांनी दिले असले तरी आम्हाला त्यावर आक्षेप नाही. मुळात आम्हाला कोणत्याही ऑपरेशनची गरज नाही, कारण ठाकरेंचे शिलेदार स्वतःहून आमच्याकडे येण्यास उत्सुक आहेत. मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्या ठाकरेंना आता स्वतःचा पक्षही सांभाळता येत नाहीये.
निरुपम यांनी केवळ ठाकरेंवरच नाही, तर शरद पवारांवरही निशाणा साधला. शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याने स्वतःचा पक्ष वाढवण्याऐवजी अजित पवारांच्या निधनानंतर विलीनीकरणाची भाषा करावी, हे महाराष्ट्राच्या राजकारणाचे दुर्दैव आहे, असे ते म्हणाले.
विदर्भात पक्षविस्तारावर बोलताना त्यांनी मित्रपक्षाबाबतची भीती फेटाळून लावली. भाजप मित्रपक्षांना संपवते हा गैरसमज आहे. नितीश कुमार २० वर्षांपासून सोबत आहेतच. भाजपला अधिक ताकद देण्यासाठी शिवसेनेने स्वतःची शक्ती वाढवणे काळाची गरज आहे,असे मत निरुपम व्यक्त केले.








