Bhaiyaji Joshi’s statement is more dangerous than Abu Azmi’s comment : खासदार संजय राऊत यांची टीका; मुख्यमंत्र्यांनी कारवाई करून दाखवावी
Mumbai राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह सुरेश उर्फ भैय्याजी जोशी यांनी मराठीबद्दल केलेले वक्तव्य अत्यंत गंभीर आहे. औरंगजेबबद्दल आमदार अबु आझमीने केलेल्या विधानापेक्षाही भयंकर आणि लाजिरावाणे आहे, अशी टीका राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी केली आहे. मराठीबद्दल थोडा जरी स्वाभिमान शिल्लक असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis यांनी भैय्याजी जोशींच्या विरोधात विधानसभेत निंदा प्रस्ताव आणावा, असे आव्हान शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी दिले आहे.
मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना रा. स्व. संघाचे माजी सरकार्यवाह व रा. स्व. संघाच्या राष्ट्रीय समितीचे सदस्य भैय्याजी जोशी यांनी मुंबईची भाषा केवळ मराठी नसल्याचे विधान केले आहे. घाटकोपरची भाषा गुजराती असल्याचे विधान त्यांनी म्हटले आहे. यावरून खासदार संजय राऊत यांनी खरपूस समाचार घेतला आहे.
समाजवादी पार्टीचे आमदार अबु आझमी यांनी औरंगजेबबद्दल केलेल्या विधानापेक्षाही भैय्याजी जोशी यांनी केलेले विधान भयंकर आहे. या वक्तव्याने केवळ मराठी भाषेचा नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचा व मुंबईसाठी शहीद झालेल्या १०६ हुतात्म्यांचा अपमान झाल्याचे स्पष्ट म्हटले आहे.
मुंबईत येऊन मराठीचा अपमान करणारे विधान भैय्याजी जोशी यांनी केले. कारण स्वाभिमान गमावलेले व गुजराती सत्ताधाऱ्यांची गुलामी करणारे सरकार राज्यात आहे. भैय्याजी जोशी यांनी मुंबईप्रमाणे कोलकाता (बंगाली), चेन्नई (तामीळ) लखनौ (हिंदी), बंगलुरू (कानडी), हैदराबाद (तेलगू) व लुधियानामध्ये (पंजाबी) जाऊन तेथील मातृभाषांबद्दल विधान करून दाखवावे, असे आव्हान त्यांनी दिले.
मराठीचा अपमान झाल्यानंतरही सत्तारुढ पक्षाचे नेते शांत आहेत. फडणवीस सरकारमधील दोन मिंधे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी रा. स्व. संघाचा निषेध केला पाहिजे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठीसाठी आयुष्य वेचले. एकनाथ शिंदे स्वतःला बाळासाहेबांच्या विचारांचे वाहक म्हणून घेतात. आता हे विचारवाहक कुठे लपून बसले आहे, असा सवाल त्यांनी केला.