santosh-deshmukh-murder-case-beed-dadasaheb-khindkar-claim-withdraw-complaint : संतोष देशमुख हत्येवरून धक्कादायक दावा
Beed : मस्सागावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवा वाद निर्माण झाला असून, तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. धनंजय देशमुख यांचे साडू दादासाहेब खिंडकर यांनी तुरुंगातून सुटल्यानंतर हा धक्कादायक दावा केला आहे.
१३ महिन्यांच्या कालावधीनंतर कारागृहातून बाहेर आलेल्या दादासाहेब खिंडकर यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना सांगितले की, त्यांच्यावर जुन्या व्हिडिओच्या आधारे खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाच्या माध्यमातून त्यांना तुरुंगात टाकण्यात आले आणि त्यांचा वापर संतोष देशमुख हत्या प्रकरण दाबण्यासाठी करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
Yashwant verma : नोटांच्या बंडल प्रकरणी न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा
खिंडकर यांच्या म्हणण्यानुसार, ते तुरुंगात असताना संबंधित आरोपींकडून धनंजय देशमुख यांच्यापुढे प्रस्ताव ठेवण्यात आला होता. “दादासाहेब खिंडकरला सोडवायचं असेल तर संतोष देशमुख हत्या प्रकरणाची तक्रार मागे घ्या,” असा प्रस्ताव देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. या दाव्यामुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
तसेच, आपल्या विरोधात खोटा गुन्हा दाखल करणाऱ्यांमागे मोठी राजकीय शक्ती असल्याचाही आरोप त्यांनी केला. गावातील अनेक लोकांवर अशाच प्रकारे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले असून, संबंधितांनी अनेकांना मारहाण केल्याचे व्हिडिओही पोलिसांना दिल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या सर्व प्रकरणांमध्ये संबंधित आरोपींवर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, तुरुंगातून सुटल्यानंतर दादासाहेब खिंडकर यांचे फटाक्यांच्या आतषबाजीसह स्वागत करण्यात आले. यावर स्पष्टीकरण देताना त्यांनी सांगितले की, १ मार्च रोजी वाढदिवस असल्याने मित्रांनी उशिरा जल्लोष केला.
या सर्व घडामोडींमध्ये, आपण देशमुख कुटुंबासोबत ठामपणे उभे असून हा लढा सुरूच राहील, असे सांगत खिंडकर यांनी माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केले. या आरोपांमुळे संतोष देशमुख हत्या प्रकरण चर्चेत आले असून, याबाबत पुढील तपासात काय निष्पन्न होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
___








