sharad-pawar-on-varkari-community-reactionary-infiltration-religious-forces-delhi-sahitya-sammelan : धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी होते, शरद पवारांची खंत
Delhi: राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी वारकरी संप्रदायाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. समतेचा आणि प्रबोधनाचा संदेश देणाऱ्या वारकरी परंपरेत प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांची घुसखोरी होत असल्याचे त्यांनी नमूद केले. दिल्लीत आयोजित महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित स्मरणिकेत त्यांनी हे भाष्य केले असून, त्यांच्या या मतामुळे सामाजिक आणि राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
वारकरी संप्रदाय हा परंपरेने समानता, भक्ती आणि सामाजिक प्रबोधनाचा संदेश देणारा प्रवाह मानला जातो. मात्र, या संप्रदायामध्ये सध्या काही प्रतिगामी विचारांचे लोक प्रवेश करत असून, त्यांच्या मांडणीमुळे धर्मांध शक्तींना बळ मिळत असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले. त्यांनी असेही नमूद केले की, या संप्रदायातील सुमारे साठ टक्के लोक बोलताना अशा प्रकारची भूमिका मांडतात, जी समाजात विभागणी वाढवणारी ठरू शकते.
Sunetra pawar : सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका, रुपाली चाकणकरांवर गंभीर आरोप !
याच पार्श्वभूमीवर पुरोगामी विचार मांडणाऱ्या व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम सुरू केल्याचेही त्यांनी सांगितले. सध्या सुमारे चाळीस जण असे आढळून आले आहेत की, जे कीर्तन आणि प्रवचनातून प्रबोधनात्मक विचार मांडत आहेत. अशा लोकांची समाजाला मोठी गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. मात्र, या प्रबोधनाच्या वाटचालीत महिलांचा सहभाग अत्यल्प असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, दिल्लीत पार पडणाऱ्या महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महिलांच्या धोरणांविषयीही आपले विचार मांडले. केंद्रीय मंत्री म्हणून काम करत असताना महिलांसाठी स्वतंत्र धोरण आखण्याची गरज का भासली, याबाबत त्यांनी आपल्या वैयक्तिक अनुभवांचा उल्लेख केला. त्यांच्या आईचा प्रभाव आपल्या विचारांवर मोठा असल्याचे त्यांनी सांगितले. त्या काळात जिल्हा लोक बोर्डावर महिला प्रतिनिधी म्हणून निवडून आलेल्या त्यांच्या आईने अत्यंत जबाबदारीने काम केले, एकही बैठक न चुकवता अभ्यासपूर्वक सहभाग घेतला, असे त्यांनी नमूद केले.
Nagpur congress : नागपूर काँग्रेसचा ‘बॉस’ कोण? अरुण यादव नागपुरात; विकास ठाकरेंचाच शब्द अंतिम ठरणार?
या साहित्य संमेलनाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून, देशभरातील महिला अधिकाऱ्यांचा या कार्यक्रमात सहभाग आहे. शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे वारकरी संप्रदाय, सामाजिक विचारधारा आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीवर नव्याने चर्चा सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








