If uncle and nephew and two brothers become one, it is welcome said Congress Leader Harshawardhan Sapkal : विभाजनवादी विचारांना मुठमाती देऊन भारत जोडोचा प्रयत्न
Mumbai : एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील, अशी चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे शरद पवार आणि अजित पवार एक होतील, अशी भाकिते वर्तवली जात आहेत. त्यातच ‘आमच्या पक्षातील एक गट अजित पवारांसोबत जाण्याच्या विचाराचा आहे’, असे वक्तव्य करून शरद पवारांनी या चर्चेला बळ दिले आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट आणि उद्धव व राज ठाकरे एकत्र आले, तर आमचा काहीही आक्षेप नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात सपकाळ म्हणाले, दुभंगलेले पक्ष, दोन भाऊ एकत्र येत असतील तर हरकत नाही. काँग्रेस पक्ष विभाजनवादी विचारांना मुठमाती देऊन भारत जोडोचा विचार घेऊन पुढे जात आहे. एकत्र येताना सर्वांनी विभाजनवादी विचारांना मुठमाती दिली पाहिजे. लोकशाही आणि संविधानाच्या संरक्षणासाठी जे पक्ष पुढे येतील, त्यांच्यासोबत काँग्रेस राहील. पण दोन्ही पक्षांच्या एकत्र येण्यासंदर्भात काही ठोस घडामोड झाल्यास त्यावर प्रतिक्रिया देता येईल.
India – Pakistan War : महाराष्ट्रात मॉकड्रिल, ब्लॅकआऊट संदर्भात मुख्यमंत्र्यांचे निर्देश !
काँग्रेस पक्ष भाजपच्या विरोधात लढत आहे. शरद पवार इंडिया आघाडीचे महत्वाचे नेते आहेत. काही राजकीय घडामोड झाली तरच त्यावर आम्हाला भूमिका घेता येईल. राज्यात महाविकास आघाडी म्हणून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेससोबत लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढलो आहोत. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत हे निर्णय स्थानिक पातळीवर घेतले जातील, असे सपकाळ म्हणाले.
भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले आहे. अशा वेळी सर्वांनी भारतीय लष्कराच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. सरकारसोबत असल्याचे काँग्रेसने यापूर्वीच जाहीर केले आहे. एकीचे बळ दाखवून दहशतवाद पूर्णपणे संपवला पाहिजे. २६/११ च्या हल्ल्यानंतर दुभंगलेला समाज आपण पाहिला. पण यावेळी तसे दिसत नाही, हे महत्वाचे आहे. पाकिस्तानवरील हल्ल्याकडे राजकारणापलीकडे जाऊन पाहिले पाहिजे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.