39 years have passed since the first farmer suicide : पहिल्या शेतकरी आत्महत्येला ३९ वर्षे पूर्ण; यवतमाळात झाली होती नोंद
Wardha चार दशकांमध्ये कित्येक सरकारं आलीत, कित्येक गेलीत. आश्वासनं मिळाली, पॅकेज आले. सरकारच्या तिजोरीतून निघालेला पैसा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलाच नाही. जो पोहोचला तो शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतरच. अनेक समित्यांनी चिंतन केले. अहवाल देऊन उपाय सुचवले. पण तरीही आज एवढ्या वर्षांनी सुद्धा शेतकरी आत्महत्येचा प्रश्न सुटलेला नाही. पहिल्या आत्महत्येला ३९ वर्ष झाल्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा याची चर्चा होत आहे.
३९ वर्षांपूर्वी १९ मार्च १९८६ या दिवशी यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील चिलगव्हाणचे रहिवासी साहेबराव करपे या शेतकऱ्याने जगणे असह्य झाल्यामुळे संपूर्ण कुटुंबासह वर्धा जिल्ह्यातील दत्तपूर येथील कुष्ठधामात आत्महत्या केली होती. ही आत्महत्या राज्यातील पहिली शेतकरी आत्महत्या म्हणून नोंद झाली होती. या घटनेने संपूर्ण राज्य हादरून गेले होते. या घटनेला आज, बुधवार १९ मार्चला ३९ वर्षे पूर्ण होत आहे.
या घटनेनंतर ही राज्यात शेतकरी आत्महत्यांची सुरु झालेली साखळी आजही सुरुच आहे. मागील दोन महिन्यांत वर्धा जिल्ह्यात ४० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे धडधडीत वास्तव आहे. तशी नोंदही प्रशासनाने घेतली आहे.शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सुरु झालेले सत्र आजही थांबले नाहीत. शेतकरी आत्महत्यांच्या बाबतीत महाराष्ट्र आघाडीवर आहे.
सरकारे बदलली पण, शेतकऱ्यांचे हाल थांबले नाहीत. आता परिस्थिती आणखी बिकट बनली आहे. कालपर्यंत शेतकरी आत्महत्या करीत होते. नवीन आकडेवारीवरून आता शेतकऱ्यांची मुले म्हणजेच बेरोजगारही फार मोठ्या संख्येने आत्महत्या करीत आहे. मृत्यूने आता शेतकऱ्यांच्या मुलांचाही पाठलाग सुरु केला असल्याचे कटू पण सत्य आहे.
अर्थसंकल्पापूर्वी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल विधिमंडळात ठेवला. त्यात उद्योग तसेच सेवा या दोन महत्त्वाच्या क्षेत्रांत चालू आर्थिक वर्षात राज्याची पिछेहाट झाल्याचे म्हटले आहे. मात्र, गेल्यावर्षी झालेल्या दमदार पावसाने कृषी क्षेत्राने तारत अर्थव्यवस्थेला आधार दिल्याचे म्हटले. हाच प्रकार कोरोना काळात होता. सर्व बंद असताना शेेती सुरु होती. अख्खे जग शेतीने जगवले. जगाला जगविणारा, अर्थव्यवस्थेला तारणारा शेतकरी का मरतो, याचा विचार आता प्राधान्याने करण्याची वेळ आली आहे.
Yogesh Sagar : विधानसभेत गाजली HSRP, वेबसाईटमधून सरकारचा सायबर फ्रॉड !
सातत्याने तोट्याच्या शेतीतून शेतकऱ्यांची होणारी आर्थिक कुचंबणा, हे आत्महत्येचे मुख्य कारण मानले जाते. शेतीला सिंचन, विजेचा अभाव, महागडे बियाणे, खते, कीटकनाशके, पेरणीच्या हंगामात पुरेशा कर्ज पुरवठ्याचा अभाव, सावकारी बेहिशेबी कर्जाचा पाश, नैसर्गिक आपत्ती, बाजारात होणारी लूट, कमी भाव ही शेती तोट्यात जाण्याची प्रमुख कारणे आहे.