Epic battle in Baramati-Sunetra Pawar faces a tough test against 19 contenders : विधानसभा पोटनिवडणुक,२३ एप्रिलला मतदान, ४ मे रोजी निकाल
Pune : बारामतीत महासंग्राम रंगण्याची चिन्हे स्पष्ट झाली असून १९ उमेदवारांविरोधात सुनेत्रा पवार यांची खरी कसोटी लागणार आहे. राज्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींमध्ये गणल्या जाणाऱ्या या विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीने वातावरण तापले आहे. दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी आता नव्या नेतृत्वाची चुरस निर्माण झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. मात्र, त्यांच्या विरोधात आधीच तब्बल १९ उमेदवार रिंगणात उतरल्याने ही लढत अधिकच रंगतदार आणि चुरशीची ठरणार आहे.
या पोटनिवडणुकीसाठी २३ एप्रिल रोजी मतदान पार पडणार असून ४ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी भूमिका राज्य सरकारकडून मांडली गेली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील तशी इच्छा व्यक्त केली होती. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता ही निवडणूक बहुरंगी होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
आतापर्यंत दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांमध्ये विविध पक्षांसह मोठ्या संख्येने अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. हिंदुस्तान जनता पार्टीचे सतीश कदम, न्यू राष्ट्रीय समाज पार्टीचे राघू घटुकडे, राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे अरुण निटुरे हे प्रमुख पक्षीय उमेदवार आहेत. याशिवाय सागर भिसे, गजानन गवळी, त्रिशाला कांबळे, दिलीप अळोणी, दत्तात्रेय बेदरे, मिथून आटोळे, रजाक मुलाणी, संदीप खरात, विलास होळकर, अभिजीत बिचुकले, अनिल तुपे, संकेत गावडे, दादा थोरात आणि अभिजीत कांबळे हे अपक्ष उमेदवारही मैदानात उतरले आहेत. काही उमेदवारांनी एकापेक्षा अधिक वेळा अर्ज भरल्याने एकूण संख्येत वाढ झाली असल्याचेही समोर आले आहे.
दरम्यान, ओबीसी आंदोलनामुळे चर्चेत असलेले लक्ष्मण हाके हे देखील या निवडणुकीत उतरू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र ते कोणत्या पक्षाकडून लढणार की अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. तसेच काँग्रेसकडूनही उमेदवार देण्याची शक्यता असल्याने अंतिम उमेदवारांची संख्या २० पेक्षा जास्त जाण्याची चिन्हे आहेत.
सध्याच्या राजकीय समीकरणांचा विचार करता सुनेत्रा पवार यांचे पारडे जड मानले जात असले तरी, मोठ्या संख्येने उमेदवार रिंगणात असल्याने मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी न ठरता रंगतदार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आगामी काही दिवसांत उमेदवारी अर्जांची अंतिम छाननी आणि माघारीनंतर नेमके किती उमेदवार रिंगणात राहतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








