Congress state president Harshvardhan Sapkal targets Devendra Fadnavis over Shivaji Maharaj’s statue in Rajkot : मुख्यमंत्र्यांनी ११ मे रोजी केले होते उद्घाटन
Mumbai : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट येथे मागील वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यानंतर केवळ आठच महिन्यांत हा पुतळा कोसळा होता. त्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात रणकंदन माजले होते. विरोधकांनी सरकारला अक्षरशः धारेवर धरले होते. राज्यभरात संतापाची लाट उसळ्यानंतर पुन्हा तेथेच छत्रपतींच्या पुतळ्याचे पुन्हा बांधकाम करण्यात आले. पण तसाच काहीसा प्रकार घडल्याने विरोधक पुन्हा सत्ताधाऱ्यांवर तुटून पडले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकोट किल्ल्यावरील पुतळ्याच्या चबुतऱ्याला मोठे भगदाड पडले आहे. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सत्ताधाऱ्यांना खडे बोल सुनावले आहे. ते म्हणाले. पुन्हा निकृष्ठ बांधकामामुळे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याला भगदाड पडले. ११ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले होते. महिन्याभरातच चबुतऱ्याला भगदाड पडले आहे. त्यामुळे या बांधकामाचा दर्जा काय असेल, हे लक्षात येते.
डिसेंबर २०२४ मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले होते. त्या कामात प्रचंड भ्रष्टाचार झाला होता. परिणामी तो पुतळा अवघ्या आठ महिन्यांतच कोसळला होता. त्यावेळी राज्यभरातील जनतेने प्रचंड संताप व्यक्त केला होता. त्यानंतर सरकारने नवीन पुतळा उभारला. पण या कामातही मोठा भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळेच चबुतऱ्याला भगदाड पडले, असा आरोप सपकाळ यांनी केला. महाभ्रष्ट महायुतीने महापुरूषांच्या पुतळ्यालाही भ्रष्टाचाराची कीड लावली आहे, हेच यावरून स्पष्ट होते आहे, असेही सपकाळ म्हणाले.