Tractor march on assembly if loan waiver not done : शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून शिवसेनेचा ठाकरे गट आक्रमक
Akola राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर न केल्यास विदर्भातील शेतकरी ट्रॅक्टर मोर्चा काढून विधानसभेवर धडक देणार असल्याचा इशारा शिवसेनेच्या ठाकरे गटाने दिला आहे. यासंदर्भात पहिली बैठक पार पडली. राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात कर्जमाफीची घोषणा न झाल्यास अमरावती विभागातील शेतकऱ्यांना एकत्र करून मोठ्या प्रमाणात आंदोलन उभारण्यात येईल.
खरीप हंगामात अवर्षण आणि अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. जून महिन्यात सुरुवातीच्या दहा दिवसांत पाऊस झाल्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात उघड होती. त्यानंतर जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पुन्हा पाऊस सुरू झाला. काही दिवस वगळता नियमित पाऊस पडत राहिला. ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये अनेकदा अतिवृष्टी झाली, आणि १० पेक्षा जास्त मंडळांमध्ये त्याची नोंद झाली.
Amravati District : ७२२ ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदाचे आरक्षण बदलणार !
परिणामी कापूस व सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी आवश्यक असल्याचे मत शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या बैठकीत नेत्यांनी व्यक्त केले. या बैठकीत उपनेते आमदार नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांनी मोर्चाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाप्रमुख मंगेश काळे, उपजिल्हाप्रमुख विकास पागृत आदींची उपस्थिती होती.
केंद्र व राज्यातील महायुती सरकार शेतकऱ्यांच्या व सामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यात अपयशी ठरले आहे, असा आरोप शिवसेनेच्या नेत्यांनी केला. सरकार आपल्या अपयशावर पांघरूण घालण्यासाठी हिंदुत्वाचा वापर करत असल्याचे टीकास्त्र त्यांनी सोडले. महायुतीतील नेते जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम करत असून, त्यांच्या मूलभूत प्रश्नांसाठी प्रत्येक तालुक्यात आंदोलन उभारले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
भाजपने निवडणुकीपूर्वी जाहीर केलेल्या वचनाप्रमाणे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी. पीक विम्याची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना कोणत्याही अटी-शर्तीशिवाय लागू करावी आणि दरमहा २१०० रुपये सरसकट महिला लाभार्थ्यांना द्यावेत. वन्यप्राण्यांपासून शेतीचे संरक्षण करावे. पीक नुकसानीसाठी तातडीने संपूर्ण मदत शेतकऱ्यांना द्यावी. कृषी पंपांसाठी त्वरित विद्युतजोडणी द्यावी, अशा मागण्या शिवसेनेने केल्या आहेत.
शिवसेनेच्या बैठकीत आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत आणि महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षबांधणीबाबत चर्चा झाली. आमदार नितीन देशमुख म्हणाले, “खऱ्या शिवसैनिकांना जागृत ठेवा. पक्ष सोडून गेलेल्यांचा विचार करू नका. गेले ते कावळे, राहिले ते मावळे!”