Shivsena Stages Protest Before District Collector Over Farmers’ Demands : जिल्हाधिकाऱ्यापुढे आंदोलन, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांच्या मदतीची मागणी
Akola ओल्या दुष्काळाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘हंबरडा आंदोलन’ छेडण्यात आले. पक्षाचे उपनेते व आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन पार पडले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांना सादर करण्यात आले.
जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे तसेच घरांचे नुकसान झाले आहे. पण शासनाकडून अद्याप अपेक्षित आर्थिक मदत जाहीर करण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर ओला दुष्काळ घोषित करावा, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत देण्यात यावी, तसेच घरे व पशुधनाचे नुकसान झालेल्यांना कोणतेही निकष न लावता आर्थिक सहाय्य द्यावे, अशा मागण्या करण्यात आल्या.
याशिवाय पीकविमा योजनेतील निकष शिथिल करून शेतकऱ्यांना तातडीने विमा रक्कम देण्याचीही मागणी करण्यात आली. या निवेदनावर आमदार नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, मंगेश काळे, ज्ञानेश्वर गावंडे, दीपक पाटील, संजय भांबेरे, सौरभ वाघोडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या काळात विद्यमान महायुती सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्तीचे आश्वासन दिले होते. मात्र, जवळपास एक वर्ष उलटूनही या आश्वासनावर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. हमीभावाअभावी शेतमाल विक्रीतून मिळकत घटल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.








