Breaking

Vidarbha Farmers : आधी पंचनामे करा, मगच राजकारण!

 

Farmers affected by unseasonal rains have expectations from the government : अवकाळी पावसाने त्रस्त शेतकऱ्यांची व्यथा; सरकारकडून अपेक्षा

भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांतील शेतकरी आजही निसर्गाच्या अवकाळी थैमानाने त्रस्त आहेत. एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतात उभे असलेले भात, गहू, हरभरा, तूर यांसारखे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. फळबागा, भाजीपाला तसेच भात साठवण केलेली खळ्यांमधील धान्ये देखील पावसाच्या तडाख्याने खराब झाली. अनेक शेतकऱ्यांनी बँकेचे कर्ज घेऊन अथवा सावकाराच्या तगाद्यातून शेती केली होती, पण आता हातात काहीच उरले नाही.

या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची एकमुखी मागणी आहे – “साहेब, लाडकी बहिणींना पैसे नंतर द्या, आधी शेतकऱ्यांच्या जखमेवर फुंकर घाला!” सरकारच्या विविध योजना, सवलती, अनुदाने यांचा नेहमीच गवगवा होतो. पण संकटात असलेल्या शेतकऱ्यांना वेळेवर मदत मिळावी, हीच त्यांची अपेक्षा असते. आज जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये अवकाळीमुळे शेती उद्ध्वस्त झाली असून शेतकरी अक्षरशः आभाळाकडे पाहत आहेत. त्यांना कोणत्या योजनेत किती मिळणार, कधी मिळणार, याची माहिती नाही.

Gondia Zilla Parishad : पदोन्नती नाकारलेले पुन्हा यादीत; शिक्षण विभागावर नियमभंगाचा आरोप!

राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री शेतकरी आपत्ती सानुग्रह मदत योजना’ जाहीर केली असली तरी प्रत्यक्षात त्याचे लाभ घेण्यासाठी ‘पंचनामे’ म्हणजेच नुकसान झाल्याचे अधिकृत नोंद करणे आवश्यक असते. मात्र बऱ्याच तालुक्यांत अजूनही पंचायत समिती आणि महसूल विभागाच्या हलगर्जीपणामुळे पंचनामे झालेले नाहीत. त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळालेली नाही.

दरम्यान, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापले आहे. महिला मतदारांसाठी ‘लाडकी बहिण योजना’, युवकांसाठी रोजगार हमी योजना, वृद्धांसाठी सवलती अशा घोषणा होत आहेत. यात शेतकऱ्यांची मागणी कुठेतरी हरवत चालली आहे. म्हणूनच शेतकरी म्हणत आहेत – “माझ्या कुटुंबासाठी आम्हीच कमावतो, आमचं अस्तित्व टिकलं तरच पुढचं सारं होईल. आधी पंचनामे करा, मगच इतर योजना जाहीर करा.”

Vidarbha Farmers : धानाचे पीक भिजले, संकट कोसळले, शेतकरी हवालदील!

शेतकऱ्यांसाठी अवकाळी पावसाच्या नुकसानीनंतर तातडीची मदत हवी आहे. ही मदत वेळेत न मिळाल्यास त्याचे मानसिक, सामाजिक आणि आर्थिक परिणाम गंभीर होऊ शकतात. आत्महत्येचा मार्ग पत्करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या पुन्हा वाढू शकते. त्यामुळे सरकारने तत्काळ सर्व भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण करून, भरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणे ही काळाची गरज आहे. अन्यथा ‘शेतकरी संप, आंदोलन, रास्ता रोको’ हे चित्र पुन्हा उभे राहू शकते.