Shiv Sena’s agitation for farmers’ electricity bill waiver : उद्धव ठाकरे शिवसेना आक्रमक; महावितरणला इशारा
Buldhana राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांकडे शासन व महावितरणचे दुर्लक्ष गंभीर असून याविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)ने बुलढाण्यात जोरदार निदर्शने करत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांचे थकीत वीज बिल पूर्णपणे माफ करण्यात यावे, बीज अनुदान मिळावे, तसेच सौर पंपांसाठी भरलेले पैसे असूनही अद्याप कनेक्शन न मिळालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ सुविधा द्यावी, अशी ठाम मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी केली.
आज १० जून रोजी बुलढाण्यात महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर बुधवत यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली. यावेळी अधीक्षक अभियंत्यांना निवेदन देण्यात आले.
मुख्य मागण्या
शेतकऱ्यांचे थकीत वीज बिल पूर्णतः माफ करण्यात यावे. बील सरासरी लावून पुन्हा पाठवण्याची पद्धत बंद करावी.
सौर पंपासाठी पैसे भरलेल्या शेतकऱ्यांना सहा महिने उलटूनही कनेक्शन न मिळाल्याची गंभीर स्थिती.
कृषी डिपींवरील ओव्हरलोड कमी करण्यासाठी मंजूर ३२ केव्ही सबस्टेशन आराखड्याची अंमलबजावणी व्हावी (गुम्मी व धामणगाव बढेसह इतर गावांचा समावेश).
अतिवृष्टी, वादळामुळे पडलेले विजेचे खांब तात्काळ बदलून अपघात टाळावेत.
बुधवत यांनी स्पष्ट इशारा दिला की, “शासन व महावितरणने जर वेळेत निर्णय घेतला नाही, तर शिवसेना जिल्हाभर आंदोलन उभारेल. शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका.”
या निदर्शनात शिवसेनेचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. महिला आघाडी जिल्हा प्रमुख सौ. चंदाताई बढे, युवा सेना जिल्हाप्रमुख नंदू कऱ्हाडे, संदीप शेळके, डी.एस. लहाने, सुनील घाटे, सुधाकर आघाव, लखन गाडेकर, अशोक गव्हाणे, अॅड. सुमित सरदार, रवि राजपूत, संजय गवळी, संतोष नप्ते, लताताई टेकाळे आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.