Women security issue rised again What do Wardha police do : महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न वर्षभरात पुन्हा ऐरणीवर
Wardha कायदे झाले, कारवाया झाल्या, शिक्षा झाली. पण तरीही महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न काही सुटला नाही. वर्धा जिल्ह्यात गेल्या वर्षभरात घडलेल्या विनयभंगाच्या घटनांवरून याचा अंदाज येतो. जिल्ह्यामध्ये मुलींच्या छेडखानीच्या घटना सातत्याने वाढत आहेत. आता नवीन वर्षात तरी पोलीस यावर नियंत्रण मिळविण्यात यशस्वी होईल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मुलींना बघून शिटी मारणे, रस्त्यात थांबवणे, छेड काढणे, त्यांच्याकडून फोन नंबर मागणे, नाव विचारणे, असे छेडछाडीचे प्रकार सुरू आहेत. अशा प्रकारानंतर तक्रार केल्यास छोटी मोठी कारवाई होते. जिल्ह्यातील १९ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत विनयभंगाच्या घटनांनी डोके वर काढले असून, गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे.
पोलिस फौजफाट्याच्या मदतीने वरिष्ठ पोलिस अधिकारी विनयभंगाच्या गुन्ह्यांची उकल करत आहेत. चारही उपविभागात मागील वर्षभरात तरुणी व महिलांवर १३८ आणि अल्पवयीन मुलींवर ५१ असे एकूण १८९ विनयभंग झाल्याच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. महिला व मुलींवरील अत्याचाराच्या ६३ टक्के गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
प्रत्येक पोलिस ठाण्यांतर्गत ज्या भागात महिलांशी संबंधित गुन्ह्यांच्या घटना समोर आल्या आहेत. त्या ठिकाणांची माहिती घेत त्यानुसार गस्तीची आखणी करण्यात येत आहे. शहरातील आर्वी नाका परिसर, रामनगरातील चौपाटी परिसर, बॅचलर रस्त्यावर रोडरोमिओंची संख्या मोठी आहे. छेडछाडीचे प्रकारही घडताना दिसतात.
झोपडपट्टीलगतचा परिसर रात्रीच्या वेळेस मद्यपी, गर्दुल्ल्यांचा अड्डा बनल्यामुळे अशा ठिकाणी छेडछाडीसह चोरीच्या घटनांची भर पडत असल्याचे तरुणींचे म्हणणे आहे. स्थानिक पोलिस ठाण्यात महिलांबाबत गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी महिला पोलिस अधिकारी, अंमलदार यांच्याकडेच तपास दिला जातो. मुली व महिलांनी न घाबरता पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करावी; तक्रारदाराचे नाव ‘गुप्त’ ठेवून कारवाई करण्यात येते.
महिला अत्याचारातही भर पडत आहे. लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित करून त्यानंतर लग्नास नकार दिल्याच्या घटनाही उजेडात आल्या आहेत. त्यामुळे महिला व तरुणींनीदेखील अशा आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
स्थानिक पोलिसांच्या दप्तरी नोंद होणाऱ्या विनयभंगाच्या वाढत्या घटनांमुळे घराबाहेर पडलेली मुलगी खरच सुरक्षित आहे का, असा प्रश्न विचारला जात आहे. हीच भीती लक्षात घेत निर्जन स्थळ, अंधाऱ्या वाटा आणि रोडरोमिओ पोलिसांच्या रडारवर आले आहेत. ओळखीचे व नातेवाईकच अशा पीडित मुली, तरुणी आणि महिलांना वेगवेगळे आमिष दाखवून त्यांच्यासोबत अत्याचार करतात. यामुळे नराधमांच्या आमिषाला कोणी बळी पडू नका, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.