Citizens walk long distances since early morning to get drinking water : पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची पहाटेपासूनच लांबवर पायपीट
Gondia : जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील स्थानिक नगरपंचायतीच्या नाकर्तेपणामुळे वॉर्ड क्रमांक १ पुनर्वसीत श्रीरामपूर येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना पहाटेपासूनच लांबवर पायपीट करावी लागत आहे. नागरिकांनी पाच दिवसांपूर्वीच नगरपंचायतीला निवेदन देऊन त्वरित टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली होती. मात्र, प्रशासनाने अद्यापही कोणतीही कारवाई केली नसल्याने येथील नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.
१५ वर्षांपूर्वी गोरेगाव तालुक्यातील सोनारटोला, भगतटोला आणि आकोटोला या गावांचे श्रीरामपूर येथे पुनर्वसन करण्यात आले. शासनाने त्यांना काही मूलभूत सोयीसुविधा दिल्या असल्या तरी त्या आजही अपुऱ्या आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात येथे भीषण पाणीटंचाई निर्माण होते आणि नगरपंचायत टँकरद्वारे पाणीपुरवठा करत असते. मात्र, यंदा प्रशासनाच्या दिरंगाईमुळे अद्याप टँकरही आलेला नाही. त्यामुळे येथील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
नळयोजना मंजूर, पण कार्यान्वित कधी ?
श्रीरामपूर येथे एकूण १५ खाजगी विहिरी, चार बोअरवेल, तसेच शासनाच्या पाच विहिरी आणि तीन शासकीय बोअरवेल आहेत. मात्र, मार्च महिन्यातच विहिरी आणि बोअरवेलनी तळ गाठला आहे. अजून कडक उन्हाळा बाकी असून, पाणीटंचाईने नागरिक हैराण झाले आहेत. शासनाने येथे नळयोजना मंजूर केली असली, तरी ती अद्याप कार्यान्वित झालेली नाही. त्यामुळे नागरिकांना समाधानकारक उपाययोजनांची प्रतीक्षा आहे.
लोकप्रतिनिधी देणार का लक्ष?
गोरेगाव नगरपंचायतीत प्रशासकराज असल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. त्यामुळेच पाणीटंचाईच्या समस्येवर अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. नागरिकांनी आमदार, खासदार व लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालण्याची मागणी केली आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पाणीटंचाई अधिकच गंभीर बनत आहे, त्यामुळे लवकरात लवकर पाणीपुरवठा करावा, अशी जोरदार मागणी होत आहे.
Water shortage issue : साडी नेसून उपसरपंचाने फोडला पाण्यासाठी टाहो!
पाच दिवसांपूर्वी निवेदन, तरीही प्रशासन सुस्त..
गोरेगाव नगरपंचायतीचे माजी बांधकाम सभापती रेवेंद्रकुमार बिसेन यांनी पाच दिवसांपूर्वी नगरपंचायतीला निवेदन देऊन त्वरित टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली होती. मात्र, याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्वरित उपाययोजना करण्याची मागणी लोकांनी केली आहे. प्रशासन यावर लवकरच ठोस निर्णय घेते की, नागरिकांना आणखी हाल सोसावे लागतात, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.