Allegation of financial gains worth crores of rupees : कोट्यवधी रुपयांच्या कामात साधले आर्थिक हित; काम बंद करण्याची मागणी हास्यास्पद
Khamgao रेल्वे गेटजवळ सुरू असलेले अंडरपास रोडचे काम बंद करून रस्ता पूर्ववत सुरू करण्याची मागणी करत महेंद्र रोहणकार १९ सप्टेंबरपासून आमरण उपोषणावर बसले आहेत. मात्र, हे उपोषण म्हणजे जनतेची दिशाभूल व निवडणुकीपूर्वीचा राजकीय थोटांग असल्याचा आरोप माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केला आहे.
सानंदा यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, अंदाजे २० कोटी रुपयांच्या या कामात रोहणकार यांचा थेट आर्थिक स्वार्थ गुंतलेला आहे. नागपूर येथील एजन्सीकडून भुयारी मार्ग खोदकाम व मुरूम काढण्याचे काम रोहणकारांना मिळाले होते. त्यांच्या मशीनरी या ठिकाणी वापरल्या गेल्या आणि कामावर रोहणकार बंधू नेहमी उपस्थित असत, हे सर्वश्रुत आहे. अशा परिस्थितीत आता उपोषण करणे म्हणजे स्वतःच्या अपयशावर पडदा टाकण्याचा प्रयत्न आहे, असा टोला त्यांनी लगावला.
रेल्वे गेटवरील अंडरपास प्रकल्प २०२३ मध्ये सुरू झाला. २०२४ मध्ये रेल्वे गेट बंद झाल्यानंतर नागरिक त्रस्त झाले तरीही कामाला वेग मिळाला नाही. मुख्य अडथळा असलेली पाईपलाईन नगरपालिकेत त्यांचेच आज्ञाधारक मुख्य प्रशासक असताना हलविण्यात आली नाही, असा आरोप सानंदा यांनी केला.
ते म्हणाले, “आज त्याच पक्षाचे माजी नगरसेवक रोहणकार उपोषणाला बसले आहेत. वेळेत निर्णय झाला असता तर महायुती सरकारची बदनामी टळली असती. आता रेल्वे प्रशासनाशी चर्चा करून उशिरा का होईना निर्णय घेतला जातोय, मात्र यात सर्वसामान्य जनता विनाकारण त्रास सहन करत आहे.”
MLA Manoj Kayande : यात्रा महोत्सवात प्रशासनाचा हलगर्जीपणा खपवून घेणार नाही
रोहणकार यांनी अंडरपास कायमस्वरूपी बंद करण्याची केलेली मागणी म्हणजे कोट्यवधी रुपयांचा अपव्यय असून त्यांच्या “अकलेचे तारे तोडणारी” आहे, अशी टीका सानंदा यांनी केली. “भुयारी मार्गातून किमान स्वर्गरथ तरी जावा, यासाठी लोक पाठींबा देत आहेत. मात्र रोहणकार हेच पाठींबा स्वतःच्या मागणीसाठी असल्याचे समजत आहेत. हा प्रकार म्हणजे मुंगेरीलालचे हसीन स्वप्न पाहण्यासारखा आहे,” असा घणाघात त्यांनी केला.








