maharashtra-politics-operation-tiger-vs-tutari-big-political-upheaval : “काहीतरी मोठं घडणार!” ऑपरेशन टायगर की ऑपरेशन तुतारी?
Mumbai : राज्याच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीची चाहूल लागली असून “कुछ तो बड़ा होने वाला है” या एका वाक्याने सत्ताकारणात खळबळ उडाली आहे. ऑपरेशन टायगर की ऑपरेशन तुतारी, याचा नेमका अर्थ काय आणि कोणत्या गटाला याचा फटका बसणार, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर या चर्चांना अधिकच उधाण आले आहे. दिल्लीमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर राज्यातील सत्तासमीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या भेटीमुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाला की शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटाला धक्का बसणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Bhujbal on Munde : “मी काही अशोक खरात नाही!” छगन भुजबळांचं मिश्कील उत्तर!
२०२२ पासून राज्याच्या राजकारणात सुरू असलेल्या उलथापालथींचा इतिहास पाहता, कोणतीही शक्यता नाकारता येत नाही. शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदे यांनी मोठा गट भाजपसोबत नेला, तर त्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोठा गट घेऊन सत्तेत प्रवेश केला. या दोन्ही घटनांनी राज्यातील राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले होते. त्यामुळे आता पुन्हा आमदार- खासदारांच्या हालचाली सुरू होणार का, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर शिंदे गटातील खासदार ज्योती वाघमारे यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय तापमान आणखी वाढवले आहे. “राज्यात काहीतरी मोठं घडणार आहे. ऑपरेशन टायगर होईल की ऑपरेशन तुतारी, हे योग्य वेळी समजेल,” असे सांगत त्यांनी अप्रत्यक्ष इशारा दिला. त्यांच्या या विधानामुळे सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही गटांमध्ये हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.
Unseasonal rain : उद्यापासून राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा
दरम्यान, दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदारांची बैठक बोलावल्यानेही या चर्चांना अधिकच धार आली आहे. शरद पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याच्या निर्णयावरून पक्षांतर्गत नाराजी व्यक्त झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. त्यामुळे विरोधी गटातही सर्व काही सुरळीत नसल्याचे संकेत मिळत आहेत.
राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता, ‘ऑपरेशन’ या शब्दाभोवती निर्माण झालेली उत्सुकता अधिकच गडद होत चालली आहे. कोणत्या पक्षात फूट पडणार, कोणत्या नेत्यांची भूमिका बदलणार आणि सत्तेचे गणित पुन्हा नव्याने मांडले जाणार का, या प्रश्नांची उत्तरं येत्या काही दिवसांत मिळण्याची शक्यता आहे.
Ashok kharat case : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाला नवे वळण; आर्थिक गैरव्यवहार ईडीची चौकशी!
एकूणच, पडद्यामागे सुरू असलेल्या हालचालींमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठा ‘राजकीय भूकंप’ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक दोघेही सध्या ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत असून पुढील काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत.
__








