Illegal sand smuggling killed 5 laborers : जालना येथील घटना; बुलढाण्याच्या एकाचा समावेश,
Buldhana जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील पासोडी शिवारात भीषण दुर्घटना घडली आहे. पुलाच्या बांधकामासाठी आलेल्या मजुरांच्या पत्र्याच्या शेडवर मध्यरात्री वाळूचा टिप्पर ओतल्याने वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबून पाच जणांचा मृत्यू झाला.
ही घटना २२ फेब्रुवारी रोजी पहाटे ३.३० वाजता घडली.
अवैध वाळू वाहतुकीचा बळी – निष्काळजी टिप्परचालकाने उडवला हाहाकार
अवैधरित्या वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या टिप्पर चालकाने पहाटे ३.३० वाजता पत्र्याच्या शेडवर वाळू ओतल्याने, शेडमध्ये झोपलेले सहा जण त्याखाली दबले. गावकऱ्यांनी वेळीच धाव घेतल्याने एक १२ वर्षीय मुलगी सुखरूप बाहेर काढण्यात यश आले, मात्र इतर पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये बुलढाण्याच्या एक मजुराचा समावेश आहे.
गणेश काशिनाथ धनवई (वय ५०, रा. गोळेगाव, ता. सिल्लोड), भूषण गणेश धनवई (वय १७, रा. गोळेगाव, ता. सिल्लोड), राजेंद्र दगडूबा वाघ (वय ४०, रा. दहिद, ता. बुलढाणा), सुनील समाधान सपकाळ (वय २०, रा. पद्मावती, ता. भोकरदन, जि. जालना) आणि सुपडू आहेर (वय ३८, रा. तोंडापूर, ता. जामनेर, जि. जळगाव)
अशी जीव गमावणाऱ्यांची नावं आहेत. सर्व मृतक एकाच कुटुंबातील नातेवाईक असल्याने या दुर्घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
या पुलाच्या बांधकामाचे काम रवींद्र आनंद या ठेकेदाराच्या देखरेखीखाली सुरू होते. स्वस्त वाळू मिळवण्यासाठी ठेकेदाराने रात्रीच्या वेळी अवैध वाळू उपसा केला आणि ती वाळू मजुरांच्या शेडवर टाकली. परिणामी हा भीषण अपघात घडला.
घटनेनंतर जाफराबाद पोलिस ठाण्याचे निरीक्षक इंगळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, गावकऱ्यांनी पोलिसांनी पंचनामा न करता शव ताब्यात घेऊ नये असा विरोध दर्शवला. अखेर पोलिसांनी पंचनामा पूर्ण करून मृतदेह ताब्यात घेतले. या घटनेत महसूल पथकाचीही मदत घेण्यात आली.
या दुर्घटनेमुळे अवैध वाळू उपसा आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अनेक निष्पाप जीव गेले असल्याची चर्चा आहे. ठेकेदार, टिप्पर चालक आणि अवैध वाळू तस्करीशी संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.