520 Gram Panchayats, 1367 villages and only 105 libraries : ‘गाव तिथे ग्रंथालय’ योजना कागदावरच, कशी रुजणार वाचन संस्कृती?
Wardha वर्धा जिल्ह्यात ५२० ग्रामपंचायतीत १३६७ गावे आहेत. कायद्यानुसार गाव तिथे ग्रंथालय असायला हवे होते. मात्र, जिल्ह्यात उपलब्ध ग्रंथालयाची टक्केवारी ही ७ ते ८ टक्के एवढीच आहे. संपूर्ण जिल्ह्यात फक्त १०५ ग्रंथालये आहेत. शासनाच्या योजनेचा बट्याबोळ झाल्याचे सिद्ध करणारी ही स्थिती आहे. या परिस्थितीमध्ये वाचन संस्कृती कशी रुजणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी, वाचन संस्कृती टिकावी यासाठी गाव तिथे ग्रंथालय संकल्पना अधोरेखित केली होती. यासाठी १९६७ मध्ये ग्रंथालय कायदा करीत राज्यात ग्रंथालयाची निर्मिती केली. मात्र, स्वातंत्र्योत्तर काळात ही चळवळ केवळ कागदोपत्रीच शिल्लक राहिल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात सध्याच्या घडीला १०५ ग्रंथालये आहे. गत एक तपापासून एकाही नवीन ग्रंथालयाला मान्यता मिळाली नाही, तर आहे त्या ग्रंथालयाची दयनीय अवस्था झाली आहे.
Wardha Administration : वाळूचे ट्रॅक्टर तर दिसले, मग अधिकाऱ्यांनी कारवाई का केली नाही?
तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी गाव तिथे ग्रंथालय असावे, असे मत मांडले होते. त्यानुसार राज्यात १९६७ मध्ये ग्रंथालय कायदा बनवून राज्यात ग्रंथालय स्थापनेची मोहीम हाती घेतली होती. त्यामुळे वाचन संस्कृती वाढली पाहिजे यासाठी जोर देण्यात आला. परंतु, सन २०१२ मध्ये नव्या ग्रंथालयांना मान्यता देणे बंद केले. शिवाय या ग्रंथालयांना मिळणारे तोकडे अनुदान सहामाही मिळत आहे. त्यामुळे काही मोजकी ग्रंथालये वगळता इतर ग्रंथालये केवळ नावालाच शिल्लक राहिलेली आहे.
जिल्हा ग्रंथालयासह जिल्ह्यात फक्त १०५ ग्रंथालये आहेत. त्यातही १० ग्रंथालयांनी वार्षिक रिपोर्ट व अक्षांक सादर केला नसल्यामुळे त्यांचे तात्पुरते अनुदान थांबवण्यात आलेले आहे. आधुनिक काळात डिजिटलचा वापर जास्त प्रमाणात झालेला आहे. त्या अनुषंगाने सरकारने डिजिटल लायब्ररी सुरू करण्याचा निर्णय घेतला. परंतु राज्यात किती लोक मोबाइलवर ग्रंथ, कादंबरी वाचतात का ते तपासणे गरजेचे आहे.