NCP state president Sunil Tatkare is allergic to the name ‘Sangram’ or to Marathas : युवांच्या नाराजीचा फटका पक्षाला भविष्यात बसेल, याची शक्यताही नाकारता येणार नाही
Nagpur : गटबाजी ही कोणत्याही राजकीय पक्षाला चुकलेली नाही. सर्वच पक्षांना या समस्येला तोंड द्यावे लागते. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ असताना तेथेही गटबाजी होतीच. अजित पवार आपला एक गट घेऊन काम करत होते. वेळ आल्यावर त्यांनी पक्षप्रमुखांना हिसका दिला आणि महायुतीमध्ये सामील होऊन सत्तेत बसले. जे अजित पवारांनी केले, ते भविष्यात त्यांच्या पुढ्यात येणार नाही, याची काही शाश्वती नाही. पण ते येवढ्या लवकर होईल, अशी अपेक्षा कदाचित कुणीही केली नसेल.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षामध्ये सध्या अजब राजकारण सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अजित दादांच्या जवळच्या लोकांना डावलण्याचा एकमेव कार्यक्रम राबवण्याचा सपाटा लावला आहे, असा आरोप चक्क कार्यकर्तेच करू लागले आहेत. तटकरेंनी आधी नगर जिल्ह्यातील आमदार संग्राम जगताप यांचे मंत्रीपद हिरावून घेतले. त्यानंतर संग्राम कोते पाटील यांना विधान परिषदेवर जाण्यापासून रोखले. त्यामुळे ‘तटकरेंना अॅलर्जी ‘संग्राम’ नावाची की मराठ्यांची’, हा प्रश्न तळागाळातील कार्यकर्ते विचारू लागले आहेत.
Teacher recruitment scam : नागपूर-नाशिकमधील सात अधिकारी कारवाईच्या फेऱ्यात
राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून सुनील तटकरे हेच सर्वात मोठे लाभार्थी ठरले आहेत. स्वतः, मुलगा अनिकेत आणि मुलगी अदिती यांच्यासाठी त्यांनी मोठी तजवीज करून ठेवलेली आहे. तटकरे स्वतः प्रदेशाध्यक्ष आहेत. पदाचा वापर करून ते हाडाच्या कार्यकर्त्यांना एक-एक करून डावलत आहेत, असेही कार्यकर्ते खासगीत सांगतात. नगर जिल्ह्यातील आमदार संग्राम जगताप हे मंत्रीपदासाठी दावेदार होते. पण ‘नगर जिल्ह्याला मंत्रीपदाची काय गरज?’, असे म्हणत त्यांनी संग्राम जगताप यांना मंत्रीपद मिळू दिले नाही.
विधान परिषदेच्या निवडणुकीत संग्राम कोते पाटील दावेदार होते. पक्षसंघटनेतील अनेक मोठ्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे नाव पुढे रेटले होते. विधान परिषदेवर त्यांना पाठवण्याचे जवळपास निश्चित झाले होते. पण येथेही सुनील तटकरे यांनी प्रतिष्ठेचा मुद्दा करून ही निवड रोखली. त्यानंतर कार्यकर्ते नाराज झाले. अजित दादांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली, हा भाग वेगळा. पण एक सल राहीली ती राहीलीच.
संग्राम कोते पाटलांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असताना अजित दादांसाठी महाराष्ट्रभर जवळपास साडेतीन लाख किलोमीटर प्रवास करून युवांची फळी उभी केली होती. अन् आता त्यांनाच डावलल्यामुले राज्यभरातील युवा नाराज आहे. आता सत्ता आहे, त्यामुळे ही बाब जाणवणार नाही. पण युवांच्या नाराजीचा फटका पक्षाला भविष्यात बसेल, याची शक्यताही नाकारता येणार नाही.