Do government teachers’ children study in municipal schools? : गदडकरींचा शिक्षकांना थेट प्रश्न; मोठ्या शाळांमध्ये प्रवेशाची धडपड
Nagpur आमदारांपासून तर शिक्षकांपर्यंत सारेच महापालिकेच्या शाळा टिकल्या पाहिजेत म्हणून ओरडतात. एक दिवस मी एका नगरसेवकाला विचारलं. तुम्हालाही विचारतो. तुमच्यापैकी किती लोकांची मुलं महापालिकेच्या शाळेत शिकतात?, असा थेट सवाल करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी शिक्षकांना चांगलेच गोंधळात पाडले.
विदर्भ गौरव प्रतिष्ठान आणि यशवंतराव चव्हाण सेंटर नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय शैक्षणिक परिषदेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी शिक्षण क्षेत्रातील मंडळींसोबत संवाद साधला. यावेळी शिक्षणतज्ज्ञ पद्मश्री डॉ. जी. डी. यादव, सच्चिदानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, राजाभाऊ टांकसाळे, महेश बंग आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते.
गडकरी पुढे म्हणाले, ‘शिक्षकांना त्याची मुलं खासगी शाळेत शिकली पाहिजेत, असं वाटतं. आणि इकडे आम्हाला अक्कल शिकवतात.’ यावेळी त्यांनी जीवन सुसह्य करणारे शिक्षण आवश्यक असल्याचा मुद्दाही मांडला. ‘शिक्षणाचा संबंध जसा ज्ञानाशी आहे. आपल्याला असलेल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी होत असेल तर त्याचे महत्त्व अधिक वाढत असते. त्यादृष्टीने लोकांचे दैनंदिन जगणे सुसह्य करणारे शिक्षण देणे आता काळाची गरज आहे,’ असं ते म्हणाले.
गडकरी म्हणाले, ‘सर्वांत आधी शिक्षणाचे उद्दिष्ट समजून घेतले पाहिजे. आपले शिक्षण उद्याचा नागरिक घडविण्यासाठी आहे. त्याच्यावर संस्कार करण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे. ही बाब प्रत्येकाने ध्यानात ठेवण्याची आवश्यकता आहे.’
आपण जो विद्यार्थी घडवतोय, तो भविष्यात कश्या प्रकारचा नागरिक असेल, याचे उत्तर आज देणे शक्य नाही. कारण परिपूर्णतेची खात्री कुणीही देऊ शकत नाही. पण प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांमधील गुण ओळखता येतील का, त्या गुणांना विकसित करता येईल का आणि त्याच गुणांच्या आधारावर भविष्यात रोजगार मिळविता येईल का, याचा विचार करावा लागेल, असेही गडकरी म्हणाले.