Breaking

Water shortage : पुजारीटोला प्रकल्पातून भागणार गोंदियाची तहान!

 

Water supply to Gondia from Pujaritola project : आता दोन दिवस आड होणार पाणीपुरवठा

Gondia वैनगंगा नदीने यंदा गोंदिया शहरासह कुडवा आणि कटंगी परिसरातील नागरिकांची साथ सोडली आहे. परिणामी, उन्हाळ्याच्या तडाख्यात तहानलेले शहर आता पुजारीटोला प्रकल्पातील राखीव पाण्यावर अवलंबून राहणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने यासाठी आगाऊ नियोजन करत १० दलघमी पाणी आरक्षित केले होते, जे आता नागरिकांच्या मदतीला धावून आले आहे.

डांगोरली येथील वैनगंगा नदीतून पाणी उचलून त्यावर प्रक्रिया करून दररोज सकाळी ७ ते ८ या वेळेत नागरिकांना पुरवले जात होते. मात्र, नदीच्या पाणीपातळीत मोठी घट झाल्याने पुरेसा पाणी साठा उपलब्ध राहिलेला नाही. त्यामुळे आता पुजारीटोला प्रकल्पातील पाणी वैनगंगा नदीत सोडून त्यातून पाणीपुरवठा केला जाणार आहे. यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि पाटबंधारे विभागामध्ये आवश्यक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Education in Gondia : गोंदियातील २२८ शाळांचा वीजपुरवठा खंडित

विशेष म्हणजे, २०१८ व २०१९ मध्ये देखील अशीच बिकट स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळीही पुजारीटोला प्रकल्पातील पाण्याने शहरवासीयांची तहान भागवली होती. याच अनुभवातून शिकत, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण दरवर्षी १० दलघमी पाणी आरक्षित ठेवण्याचे धोरण राबवत आहे. यंदाही त्याच आरक्षित पाण्यावर शहराचा पुढील दोन महिने आधार राहणार आहे.

सध्या जिल्ह्यात तापमान ४२.६ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. प्रत्यक्ष मे आणि जून हे उन्हाळ्याचे खरे कठीण महिने असून, त्यात पाण्याचा तुटवडा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. अशावेळी पुजारीटोला प्रकल्पाचे पाणी किती दिवस पुरेल, यावर सगळ्यांचे लक्ष केंद्रित झाले आहे. दमदार पाऊस पडून वैनगंगा नदीत नव्याने पाणी येईपर्यंत, हा साठा पुरेसा असणे अत्यंत गरजेचे आहे.

Local Body Elections : आमगाव तालुक्यातील महिला राज!

दरम्यान, पाण्याच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने आता दोन दिवस आड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवार (दि. २५ एप्रिल) रोजी पुरवठा झाल्यानंतर पुढील पाणी सोमवारी (दि. २८ एप्रिल) मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा, असा आग्रह प्राधिकरणाने केला आहे.

पुजारीटोला प्रकल्पाचे पाणी जपून वापरल्यासच पुढील काळातील पाणीटंचाई टाळता येऊ शकते. नागरिकांनी या काळात जबाबदारीने पाणी वापरून प्रशासनाला सहकार्य करणे, हाच सध्याचा सर्वोत्तम उपाय आहे.