Breaking

MLA Chainsukh Sancheti : पाणीपुरवठ्यात दिरंगाई; आमदार संचेती आक्रमक

 

Delay in water supply, officials warned of suspension : अधिकाऱ्यांना निलंबनाचा इशारा; प्रशासनावर थेट सवाल

Buldhana मलकापूर शहरातील दूषित पाणी व वाढती अस्वच्छता यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देत आमदार चैनसुख संचेती यांनी थेट निलंबनाच्या इशाऱ्यासह नगरपालिका अधिकाऱ्यांना चार दिवसांची अल्टिमेटम दिली आहे. पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई अटळ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शहरातील अनेक भागांमध्ये नळांमधून गढूळ, पिवळसर व दुर्गंधीयुक्त पाणी येत असून, त्यामुळे नागरिकांना त्वचाविकार, उलट्या, पोटदुखी, डायरिया अशा आजारांचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे, प्रत्येक गल्लीत कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याने घनकचरा व्यवस्थापनाचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे.

महत्त्वपूर्ण बैठक; प्रशासनावर थेट सवाल
५ मे रोजी झालेल्या आढावा बैठकीत आमदार संचेती यांनी प्रशासक राहुल तायडे व प्रभारी मुख्याधिकारी प्रशांत शेळके यांच्यासमवेत नगरपालिका प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. “पिण्याचे पाणी ही केवळ सेवा नसून आरोग्याशी संबंधित अत्यंत संवेदनशील बाब आहे,” असे सांगत त्यांनी थेट कारवाईचा इशारा दिला.

Vidarbha Farmers : शेतकरी भावंडांनी स्वखर्चातून उभारला शेतरस्ता!

दैनंदिन आढावा; उपाययोजनांची मागणी
संचेती यांनी प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले की, पुढील चार दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, तर कडक पावले उचलण्यात येतील. दररोज सकाळी उपाययोजनांचा आढावा घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आमदार निधीतून मदतीचा हात
संचेती यांनी धोपेश्वर येथील जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी करत पॅनल ट्रान्समीटर (५०० केव्ही), पाइपलाइन इत्यादीसाठी आमदार निधीतून सामग्री देण्याचे आश्वासन दिले.

Dongao Grampanchayat : तीन अपत्ये, अतिक्रमण; ग्रामपंचायत सदस्य अपात्र

घनकचऱ्यावर ‘डायरेक्ट अ‍ॅक्शन’
कंत्राटदाराऐवजी आता पगारी सफाई कर्मचाऱ्यांमार्फत कचरा व्यवस्थापन करण्याचा निर्णय झाला आहे. हे कर्मचारी ८ मेपासून प्रत्यक्ष कामास सुरुवात करणार असून, सकाळी ७ वाजता आमदार स्वतः कामाची पाहणी करणार आहेत.

अधिकाऱ्यांची झोप उडाली!
या झडतीमुळे नगर पालिका प्रशासनात भीतीचं वातावरण आहे. अधिकारी व कर्मचारी यांना आता आपापली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी लागणार आहे. एका बाजूला आमदार संचेती नागरिकांच्या प्रश्नांवर आक्रमक आहेत, तर दुसरीकडे मनपा प्रशासनाचे उपक्षेपजनक आणि उदासीन वर्तन जनतेपुढे उघडे पडले आहे.