Mangalprabhat Lodha appeals that everyone should learn disaster management lessons in war-like situations : राज्यातील सर्व ITI मध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या ऑनलाईन कार्यशाळा
Thane – Mumbai : पहलगाम येथे दहशतवाद्यांचा हल्ला. त्यानंतर भारताचे ऑपरेशन सिंदूर आणि आता ऑपरेशन सिंदूर २.० यामुळे युद्धजन्यस्थिती झाली आहे. अशा परिस्थितीत भारतातील प्रत्येक नागरिकाने आपत्ती व्यवस्थापनाचे धडे घेतले पाहिजे, असे राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले आहे.
कौशल्य विभाग आणि अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यामाने राज्यातील विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले जात आहेत. ठाणे येथील राजमाता जीजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत काल (८ मे) या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी मंगलप्रभात लोढा यांनी नागरिकांना आवाहन केले. शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाला जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षणाधिकारी अनिल सदाफुले, ठाणे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य स्मिता माने, शासकीय तांत्रिक विद्यालयाचे मुख्याध्यापक टिकोले. राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सर्व कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.
आपत्ती मानवनिर्मित असो किंवा नैसर्गिक याचे व्यवस्थापन आणि बचाव कसा करावा, याचे प्रशिक्षण प्रत्येक नागरिकाने घेतले पाहिजे. मानवाने प्रगती केली असली तरी आपत्तींचे स्वरुप बदललेले आहे. बचावाचे प्रशिक्षण नवीन पीढीला देण्याचा आमचा उद्देश आहे, असे मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. आयटीआयमध्ये सहा नवीन अभ्यासक्रमाची घोषणा मंत्री लोढा यांनी केली. यामध्ये कृत्रिम बुद्धीमत्ता, ईव्ही व्यवस्थापन, इंडस्ट्रीअल रोबोटिक्स आणि थ्रीडी प्रिंटींग, ड्रोन तंत्रज्ञान, सोलर टेक्नीशीयन या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून या अभ्यासक्रमांची सुरुवात होणार आहे.
Operation Sindoor : लष्कराने स्पष्ट केले ड्रोन हल्ल्याचे कारण !
राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिबिराच्या सुरुवातीला डॉ. लीना गडकरी यांनी आपत्ती व्यवस्थापन संकल्पना विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. मानवनिर्मित आपत्तीमध्ये युद्धाचाही समावेश आहे. या काळात घ्यायची काळजी, उपचार आणि बचाव यासंदर्भात विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रात्यक्षिके सादर केली.