Six thousand birth certificates will be cancelled : उशिरा नोंदणी झालेल्या जन्म प्रमाणपत्रांवर गदा; नऊ हजार अर्जांची पुन्हा पडताळणी
Akola जिल्ह्यातील उशिरा जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याप्रकरणी नायब तहसीलदारांकडून वितरित करण्यात आलेली सुमारे सहा हजार प्रमाणपत्रे रद्द करण्याची कारवाई लवकरच सुरू होणार आहे. उर्वरित नऊ हजार अर्जांची पुन्हा पडताळणी केली जाणार असल्याची माहिती भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिली.
या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर सोमय्या यांनी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा विषय उपस्थित केला. सोमय्या म्हणाले, “उशिरा जन्म प्रमाणपत्रांसाठी जिल्ह्यात तब्बल १५ हजार अर्ज प्राप्त झाले होते. यापैकी सुमारे सहा हजार अर्जांवर नायब तहसीलदारांकडून चुकीची प्रमाणपत्रे वितरित झाली असून, ती रद्द करण्याची प्रक्रिया प्रशासनाने हाती घेतली आहे. उर्वरित नऊ हजार अर्जांची पुन्हा शहानिशा केली जाणार आहे.”
या वेळी आमदार वसंत खंडेलवाल, भाजप जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील, महानगराध्यक्ष जयंत मसने, माजी महापौर विजय अग्रवाल आदी उपस्थित होते.
सोमय्या यांनी आरोप केला की, काही अपात्र अर्जदारांनाही जन्म प्रमाणपत्रे देण्यात आली. काही जण हे वास्तवात अस्तित्वातच नाहीत किंवा सध्या जिल्ह्यात नाहीत, असेही आढळून आले आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून, यामध्ये प्रशासकीय यंत्रणेची मोठी त्रुटी स्पष्ट होते.
अधिकार नसतानाही उशिरा जन्म प्रमाणपत्रे वितरित केल्याप्रकरणी संबंधित नायब तहसीलदारांविरोधात विभागीय चौकशी सुरू करण्यात येणार आहे. ही कारवाई लवकरच सुरू होईल, असेही सोमय्या यांनी स्पष्ट केले.
Shiv Sena : कारकर दाम्पत्य शिवसेनेत, उबाठाला आणखी एक धक्का !
राज्यात जुलै २०२४ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत उशिरा जन्म प्रमाणपत्रांसाठी तब्बल दोन लाख अर्ज आले होते. मात्र, गेल्या दोन महिन्यांत केवळ दोन हजार अर्ज आले आहेत. त्यामुळे जुलै ते डिसेंबर या कालावधीत राज्यभरात मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्याचा संशयही सोमय्या यांनी व्यक्त केला.