Politics is trapped within the caste and religion : शेतकऱ्यांसाठी लढा उभारण्याचा बच्चू कडूंचा इशारा
Buldhana “आजचे राजकारण जात आणि धर्माच्या चौकटीतच फिरत आहे. शेतकऱ्यांना जात नसते, धर्म नसतो. तो जगाचा पोशिंदा आहे, पण तोच उपाशी राहतो. त्याच्यासाठी लढणारे कुठे आहेत?” असा थेट सवाल करत प्रहार जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केला. शेतकऱ्यांच्या मुद्यांवरून त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे.
दरेगाव येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात बोलताना बच्चू कडू म्हणाले, “कैलास नागरे हा मरण पावला नाही, तर शहीद झाला. तो कोणत्या जातीतला होता, याला अर्थ नाही. त्याने १४ गावांसाठी खडकपूर्णा धरणाच्या पाण्यासाठी लढा दिला. पण आपण त्याचे बलिदानही विसरलो. ही शोकांतिका आहे.”
“‘बटेंगे तो कटेंगे’ म्हणणारे आज गप्प का? अजित पवार म्हणतात, ‘मी बोललोच नाही’. मग शेतकऱ्यांनी मागणी कुणाकडे करायची?” असा सवाल करत कडू म्हणाले की, “शेतकरी जर आक्रमक झाला, तर एका दिवसात सत्ता उलथवू शकतो.”
Local Body Elections : दोन वर्षांपूर्वी केलेली आरक्षण सोडत रद्द होणार?
“सव्वा लाखात घर बांधणे शक्य आहे का? आमदारांचे पगार ५० हजारांवरून २.५ लाखांवर गेले. शिक्षकांनी संघटित होऊन जुनी पेन्शन योजना लागू केली. शेतकऱ्यांनीही आता संघटीत होण्याची गरज आहे,” असे ते म्हणाले.
६ जूनला नागपुरात आंदोलन
दरेगावच्या मेळाव्यात ६ जून रोजी नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या आंदोलनात लाखोंच्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Bacchu Kadu : राज्यात तीन माकडांचे सरकार; आता रस्त्यावर उतरण्याची वेळ
या मेळाव्याला शेतकरी योद्धा बालाजी सोसे, ज्ञानेश्वर खरात पाटील, गजानन जायभाये, गजानन लोखंडकार, अमोल तुपकर, आदित्य तिवारी, हरीश जैस्वाल यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन आत्माराम गाडे व प्रहार कार्यकर्त्यांनी केले.