Simple philosophy explained to the world : वनाधिकारी असताना वन, वन्यजीव, पक्षीशास्त्रावर विपूल लेखन
Nagpur : अरण्ये म्हणजे फक्त जंगले नाहीत, तर ती आपल्या संस्कृतीची – ज्ञानदानाची जिवंत केंद्रे आहेत, असे सोपे सहज तत्वज्ञान जगारा निक्षून सांगणारे तत्वचिंतक, थोर साहित्यिक अरण्यऋषी मारूती चितमपल्ली यांचे निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. सोलापूरच्या गिरणी कामगाराच्या घरात जन्म घेतलेल्या मारूती चितमपल्ली यांनी जंगल आणि पक्ष्यांविषयी दांडगा अभ्यास केला. यासाठी त्यांना अरणऋषी म्हणून ओळखले जात होते.
वनाधिकारी म्हणून नोकरीत असतानाच त्यांनी वन, वन्यजीव आणि पक्षीशास्त्र या विषयांवर भरपूर लेखन केले. चितमपल्ली यांनी ६० ते ६५ वर्षे जंगलात राहून पशू-पक्ष्यांचा अभ्यास केला. एरवी केवळ झाडा झुडपांच्या किंवा नदीकाठच्या वर्णनाभोवती फिरणारे आपले साहित्य मारूती चितमपल्ली यांच्या कर्तुत्वाने, संकल्पकौशल्याने आणि तपस्येने समृद्ध झालेले आहे. चितमपल्ली यांच्या कार्याचा प्रभाव फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नाही, तर संपूर्ण भारतभर पसरला आहे. त्यांच्यामुळे अनेक तरुणांना वन्यजीव संवर्धनाच्या क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा मिळाली.
आपल्याला निसर्गाबद्दल प्रेम असले पाहिजे. आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडले पाहिजे, सतत नवनवीन ज्ञानार्जन करत राहिले पाहिजे आणि समाजसेवेत नेहमी सक्रीय सहभाग असला पाहिजे, ही चतुःसूत्री मारूती चितमपल्ली यांनी समाजाला दिली. आजची पिढी मारूती चितमपल्ली यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन निसर्ग संरक्षण आणि वन्यजीव संवर्धनासाठी काम करू शकते. त्यांच्या प्रेरणेमुळे आपण सगळे मिळून एक स्वच्छ आणि हिरवागार निसर्गसंपन्न भारत निर्माण करू शकतो, येवढी त्यांच्या कार्याची महती आहे.
चितमपल्ली यांचे निधन वेदना देणारे..
थोर साहित्यिक अरण्यऋषी मारूती चितमपल्ली यांचे इहलोकीचे प्रणाय प्रचंड वेदना देणारे, मन अस्वस्थ करणारे आहे. त्यांच्या सोलापूरच्या घरी घालवलेले दोन तास मला त्यांच्यासमवेत जंगलभ्रमंती केल्यासारखे आठवतात. माझे आणि चितमपल्ली यांचे नाते फार जुने आहे. ते नागपुरात असतानाचे आणि तेथून सोलापूरला गेल्यावरही आमचे नाते अधिक दृढ होत गेले, असे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना म्हणाले.
MLA Vinod Agrawal : डॉ. एस. शिवबाला यांची थेट वनमंत्र्यांकडे तक्रार !
दोन वर्षांपूर्वी २३ मे २०२३ रोजी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करायला मी त्यांच्या सोलापूरच्या घरी गेलो होतो. अनेक पुस्तके समोर ठेऊन त्यांनी मला जंगलांचे अनेक किस्से ऐकवले. माणूस, जंगल आणि प्रेरणा असा तो संवाद होता. ती भेट नवप्रेरणा देणारी ठरली. त्यावेळी मी त्यांच्या तपश्चर्येची झळाळी अनुभवली होती. यावेळी मी त्यांच्या दिनचर्येचे निरीक्षण केले. ओघवत्या भाषेत त्यांनी लिखाण कसे केले, हे त्यांनी मला तेव्हा सांगितले होते, असेही महसूल मंत्री बावनकुळे यांनी नमूद केले.