Special invitee for Republic Day celebrations in New Delhi : प्रजासत्ताकदिन सोहळ्यात विशेष निमंत्रित; उल्लेखनीय कार्याची दखल
ArjuniMorgaon : दिल्लीतील कर्तव्यपथ येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित सोहळ्याचे तालुक्यातील सिरेगावबांध येथील सरपंच सागरबाई दिलीप चिमणकर यांना आंमत्रित करण्यात आले आहे. यामुळे जिल्हावासीयांच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवला गेला आहे.
सिरेगावबांध ग्रामपंचायतीने राबविलेल्या उपक्रमाची केंद्र सरकारने दखल घेतल्याचा आनंद आहे. दिल्ली येथील कर्तव्य पथकावरील कार्यक्रमास विशेष निमंत्रित म्हणून आमंत्रण दिल्याने हा संपूर्ण गावाचा सन्मान आहे, अशी प्रतिक्रिया सागरबाईंनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्यातील जी गावे हर घर जल प्रमाणित झाली आहेत. त्या गावांतील पाणीपुरवठा योजना ग्रामस्थांना हस्तांतरित करण्यात आली आहे. ग्रामपंचायत पाणी समितीमार्फत सक्षमपणे .योजना चालविल्या जात आहेत. अशा पाणीपुरवठा समितीमधील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्यातील आठ ग्रामपंचायत आहेत. या ग्रामपंचायतींच्या सरपंचांना दिल्ली येथे प्रजासत्ताक दिन कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रित पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. यात जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सिरेगावबांधच्या सरपंच सागरबाई दिलीप चिमणकर यांचाही समावेश आहे.
सिरेगावबांध ग्रामपंचायतीने गावात विविध लोकोपयोगी उपक्रम राबवून जिल्ह्यासह राज्यस्तरापर्यंत आपली एक आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे. शासनाचे विविध पुरस्कारदेखील प्राप्त केले आहेत. प्रजासत्ताक दिनानिमित्ताने विशेष पाहुण्यांचा मान मिळाल्याने सिरेगावबांध ग्रामपंचायतीने गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
तालुक्यातील सिरेगावबांध ग्रामपंचायतने आतापर्यंत अनेक पुरस्कार प्राप्त केले. दीनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार, नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार, ई-पंचायत पुरस्कार, केंद्र शासनाचा निर्मलग्राम पुरस्कार आदी पुरस्कारांवर मोहोर उमटवली आहे. बाल हितैशी ग्रामपंचायत पुरस्कार, पर्यावरण संतुलित समृद्ध ग्रामयोजना पुरस्कार, महात्मा गांधी तंटामुक्त समिती पुरस्कार, स्मार्ट ग्राम पुरस्कार, जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्कार, राज्यस्तरीय संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान पुरस्काराचा समावेश आहे.