Devendra fadnavis : पेट्रोल अफवांवर कारवाई, अशोक खरात प्रकरणी निष्पक्ष चौकशी !

devendra-fadnavis-nagpur-statement-petrol-rumors-ncp-merger-ashok-kharat-case : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विविध मुद्द्यांवर स्पष्ट भाष्य

Nagpur : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात आयोजित ६९ व्या ऑल इंडिया पोलीस ड्युटी मीटच्या उद्घाटनानंतर माध्यमांशी संवाद साधताना राज्यातील विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी पेट्रोल साठ्याबाबत निर्माण झालेल्या अफवा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांपासून ते अशोक खरात प्रकरणापर्यंत अनेक विषयांवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

पेट्रोल पंपांवर निर्माण झालेल्या रांगांच्या पार्श्वभूमीवर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले. काही लोकांनी घाईघाईने पेट्रोल भरण्यासाठी रांगा लावल्या, मात्र प्रत्यक्षात पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. अफवा पसरवणाऱ्यांवर आता कारवाई सुरू करण्यात आली असून त्यामुळे परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Nitin Gadkari : गडकरी म्हणाले, लोकांना चालायला फुटपाथही शिल्लक ठेवले नाहीत, आता तरी अतिक्रमण हटवा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी संयत प्रतिक्रिया देत हा विषय संबंधित पक्षांमधील अंतर्गत चर्चेचा असल्याचे सांगितले. अशा प्रकारच्या प्रत्येक चर्चेवर प्रतिक्रिया देणे आवश्यक नसते, असे स्पष्ट करत त्यांनी वरिष्ठ नेते किंवा संबंधित व्यक्तींनी अधिकृतरीत्या चर्चा केल्यासच यावर भूमिका मांडली जाईल, असे सूचित केले.

देशातील पाच राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी पक्ष जिथे जबाबदारी देईल, तिथे प्रचारासाठी जाण्याची तयारी असल्याचे सांगितले. विशेषतः आसाम आणि केरळ या राज्यांमध्ये ते प्रचारासाठी जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांना देण्यात आलेल्या समन्सबाबत विचारले असता त्यांनी सध्या या प्रकरणाची सविस्तर माहिती नसल्याचे सांगितले. मात्र संबंधित प्रकरणाची चौकशी निष्पक्षपणे सुरू असून आवश्यकतेनुसारच माहिती घेतली जाते, असे त्यांनी स्पष्ट केले. योग्य वेळी या चौकशीबाबत अधिकृत माहिती दिली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी त्यांनी महाराष्ट्र पोलीस दलाचे विशेष कौतुक केले. १९५९ साली सुरू झालेल्या ऑल इंडिया पोलीस ड्युटी मीटचे पहिले आयोजन नागपुरातच झाले होते, याची आठवण करून देत यंदा पुन्हा नागपुराला यजमानपद मिळणे ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. या स्पर्धेमध्ये सायबर आणि संगणक जागरूकता, पोलीस डॉग स्पर्धा, व्हिडिओग्राफी अशा विविध विषयांवर स्पर्धा आणि ज्ञानाचे आदानप्रदान होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Ashok kharat case : जामीनासाठी जोरदार युक्तिवाद फेल; अशोक खरातला ३ दिवसांची पोलीस कोठडी

महाराष्ट्र पोलीस दल हे देशातील एक सक्षम आणि आधुनिक दल म्हणून ओळखले जाते, असे सांगत त्यांनी फॉरेन्सिक सहाय्यामुळे गुन्हेगारांना शिक्षा देण्यात मोठी मदत होत असल्याचे नमूद केले. राज्यात अत्याधुनिक सायबर लॅब उभारण्यात आली असून नव्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून पोलीस यंत्रणा अधिक सक्षम होत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.