Sharad Pawar NCP likely to stake claim to the NCP following the Supreme Court verdict : राष्ट्रवादी काँग्रेसही पक्षावरील मूळ हक्कासाठी कायदेशीर लढा तीव्र करण्याच्या तयारीत
Nagpur महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात अंतिम टप्प्यात पोहोचली असून सर्व राजकीय पक्षांचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी न्यायालयात केलेल्या जोरदार युक्तिवादामुळे उद्धव सेनेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, या निकालाच्या आधारे केवळ शिवसेनेचाच फैसला होणार नसून, त्यानंतर शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसही पक्षावरील आपल्या मूळ हक्कासाठी कायदेशीर लढा तीव्र करण्याच्या तयारीत आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ४० आमदार घेऊन बाहेर पडल्यानंतर महायुतीत सहभागी झाले, तर त्यानंतर अजित पवार यांनीही आमदारांच्या बळावर महायुतीची वाट धरली. निवडणूक आयोगाने दोन्ही प्रकरणांत केवळ आमदार आणि खासदारांच्या संख्याबळाचा आधार घेत अनुक्रमे शिंदे आणि अजित पवार यांच्या गटाला मूळ पक्ष व चिन्ह बहाल केले. या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून यावरून सध्या राजकारण प्रचंड तापले आहे.
Bhondu Baba fraud : श्रद्धेच्या नावाने शोषण, पैशांचा खेळ आणि राजकीय वरदहस्त!
विरोधकांच्या दाव्यांचा समाचार घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, शिवसेना कोणाची याचा निकाल महाराष्ट्रातील जनतेने विधानसभेच्या निवडणुकीत आधीच दिलेला आहे. त्यामुळे शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच राहणार असून विरोधकांनी उगाच स्वप्ने पाहू नयेत, असा टोला त्यांनी लगावला.
दुसरीकडे, खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांच्या दाव्याचा प्रतिवाद करत ठाम भूमिका मांडली आहे. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केली होती, त्यामुळे ती त्यांचीच आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय उद्धव ठाकरे यांच्याच बाजूने लागेल, असा दावा त्यांनी केला. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना शरद पवार यांनी केली असल्याने पक्षावर शरद पवारांचाच हक्क असल्याचे सांगत, न्यायालयीन निकालानंतर राष्ट्रवादीवरील अधिकारासाठी लढा अधिक तीव्र केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
या संपूर्ण राजकीय वादात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अत्यंत खळबळजनक आरोप केला आहे. निवडणूक आयोगाने मध्यस्थी करून शिवसेना तब्बल ५ हजार कोटी रुपयांना विकली असून हा संपूर्ण व्यवहार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कंपनीमार्फत झाल्याचा आरोप राऊत यांनी केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.








