Use your education for society : राज्यपालांनी साधला विद्यार्थ्यांसोबत संवाद; दीक्षांत समारंभाचे आयोजन
Amravati पदवी मिळणे ही विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक नवी सुरुवात आहे. विद्यार्थ्यांनी जागतिक स्तरावर विविध ज्ञानशाखांमध्ये पारंगत व्हावे. आपल्या शिक्षणाचा वापर समाजाच्या हितासाठी करावा. राष्ट्र उभारणीसाठी अविरत कार्यरत राहावे, असे आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ४१ वा दीक्षांत समारंभ विद्यापीठ परिसरात उत्साहात पार पडला. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, राज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरे, कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्यपालांनी सांगितले की, “विद्यापीठाने स्थापनेपासून परवडणारे आणि दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे जीवनमान उंचावले असून, संपूर्ण प्रदेशाच्या सामाजिक-आर्थिक स्थितीत सुधारणा झाली आहे. आता विद्यापीठाने पारंपरिक अभ्यासक्रमांसोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, डेटा सायन्स, सायबर सुरक्षा आणि रोबोटिक्स यांसारख्या प्रगत क्षेत्रांसाठीही शिक्षण व्यवस्था निर्माण करावी.”
राज्यपालांनी नमूद केले की, “आजच्या काळात खेळाडू सर्वाधिक मानधन मिळवतात. त्यामुळे विद्यापीठाने खेळाडूंना पायाभूत सुविधा आणि दर्जेदार प्रशिक्षण पुरवून उत्कृष्ट खेळाडू घडवावेत.”
“मराठीला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत जनाबाई, संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी मराठी भाषेतून विपुल लेखन आणि समाजप्रबोधन केले आहे. मातृभाषेचा सन्मान राखला गेला पाहिजे. विद्यार्थ्यांनीही जगभरातील विविध भाषा शिकून प्रगती करावी आणि मराठीत उपलब्ध असलेले ज्ञान वाढवण्यासाठी परकीय भाषांतील महत्त्वाचे साहित्य भाषांतरित करावे,” असे राज्यपाल म्हणाले.
Mahayuti Government : सरकारच्या परवानगीने १५ रुपयांची बॉटल २० रुपयांना?
विद्यापीठाने उद्योगांची गरज लक्षात घेऊन नवीन अभ्यासक्रम तयार करावेत. स्टार्टअप इकोसिस्टम आणि इनक्युबेशन केंद्रांच्या माध्यमातून स्थानिक उद्योगांना चालना मिळेल. संशोधन आणि विकासासाठी उद्योग क्षेत्रासोबत सहकार्य वाढवण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.