Mahashivratri Yatra at Hemadpanthi Koteshwar Temple : महाशिवरात्रीच्या निमित्ताने यात्रा; पुरातन महत्त्व
Wardha काशिखंड शिवपुराणात आपल्या अस्तित्वाची मोहर उमटविणाऱ्या, वर्धा जिल्ह्यातील श्रीक्षेत्र कोटेश्वर देवस्थानचे धार्मिक महत्त्व अनन्यसाधारण राहिले आहे. शिवभक्तांचे अधिष्ठान म्हणून संपूर्ण विदर्भात या शिवालयाची ख्याती आहे. उत्तर वाहिनी नदीमुळे या तीर्थक्षेत्राला काशीचे महात्म्य प्राप्त आहे. महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी शिवभक्तांची गर्दी होत असून हर हर महादेवचा गजर गगनभेदी ठरत आहे.
शिवाय धार्मिक पवित्रता जोपासण्यासाठी याठिकाणी वर्धा (वशिष्ठा) नदीच्या पात्रात केलेले गंगास्नान महत्त्वपूर्ण ठरले आहे. सोबतच गजबजलेला यात्रा महोत्सव नावीन्यपूर्ण ठरला आहे. शासनाच्या तीर्थक्षेत्र विकास व पर्यटनअंतर्गत या देवस्थानला विशेष दर्जा प्राप्त आहे. दिवंगत राज्यपाल प्रभा राव व तत्कालीन आमदार रणजीत कांबळे यांच्या प्रयत्नातून देवस्थान परिसरात १५ कोटींच्या खर्चाची अनेक विकासकामे भाविकांच्या सेवेत रुजू आहे.
Ravikant Tupkar : शेतकऱ्यांसाठी सरकारविरोधात रस्त्यावर उतरणार
या कामाची प्रशासकीय मान्यता २९ मार्च २००६ ला तसेच तांत्रिक मान्यता २०१४ ला मिळून कामाला गती दिली आहे. मंदिर परिसरातील भस्माची टेकडी ते वर्धा (वशिष्ठा) नदीच्या थडव्यापर्यंतचा भाग हिरवागार करून निसर्गाच्या सौंदर्यात भर टाकली आहे.
वशिष्ठ ऋषीचे शतपुत्र येथील अरण्यात भ्रमण करीत असताना वर्धा नदीच्या किनारी निद्रिस्थ होते. हे दृश्य बघून विश्वामित्र यांना क्रोध आला व त्यांनी क्रोधाग्नित वशिष्ठ मुनींचे शतपुत्र भस्म केले. मुनी वशिष्ठांना योग साधनेतून हा प्रकार लक्षात आला. अतिशय दुःखी अवस्थेत ते येथे आले व या जागेवर कोटी यज्ञ केले. यज्ञामुळे निर्माण झालेल्या भस्माच्या टेकडीवर वालुकामय श्री शिवलिंग स्थापन केले. विधिवत पूजा करून गंगेला प्रसन्न केले व उत्तर वाहिनी वाहण्यास विनविले.
गंगेच्या जलसिंचनाने आपले शतपुत्र सजीव केले. तेव्हापासून वर्धा (वरदा) नदीचा प्राचीन वशिष्ठा नदी म्हणून उल्लेख होत आला आहे. वशिष्ठा नदी म्हणून इतिहासात नोंद आहे. मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या वेळी आजही वीस-पंचवीस फूट खोलीत ताजी, चविष्ठ तुपकट रक्षा व काही अस्थी सापडतात. यावरून भस्माचे टेकडे असल्याचे सिद्ध होते. श्रद्धेने बेलाचे त्रिदल या जलाशयात वाहिल्यास ते तळाशी जाते. शासनाने या तीर्थस्थळाची दखल घेऊन पर्यटन क्षेत्राचा दर्जा दिला आहे.
नदीचा घाट बांधून भाविकांच्या आंघोळीची व्यवस्था केली आहे. अस्थी विसर्जन व दसवा कार्यक्रमासाठी हा परिसर वर्षभर गजबजलेला असतो. जागोजागी वृक्ष लावून परिसर हिरवा केला आहे. भस्माच्या टेकडीचा पुरातन वारसा जोपासण्यासाठी मंदिर परिसराच्या चारही बाजूंनी ३० ते ४० फूट उंचीचा कोट बांधून संवर्धन केले आहे.