Water shortage crisis in Wardha district : ऐन उन्हाळ्यात जलाशयांची पातळी खालावली
Wardha उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. आता अनेक जलाशयांची पातळी खालावली आहे. शहराला पाणीपुरवठा करणारा धाम प्रकल्प मागील वर्षाच्या तुलनेत ४५ टक्क्याहून अधिक कमी झाला आहे. धाम प्रकल्पात केवळ ४७ टक्केच पाणी शिल्लक आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाणी काटकसरीने वापरावे लागणार आहे. जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट येण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात जुलै, ऑगस्टमध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे जलाशयांची पातळी वाढली होती. त्यामुळे उन्हाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईची झळ पोहोचणार नाही, अशी आशा होती. पण उन्हाळा लागताच धाम जलाशयाची पातळी खाली जात आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात धाम प्रकल्पात ४७ टक्केच पाणी शिल्लक राहिले आहे. त्यामुळे पुढील तीन ते चार महिने नागरिकांना पाणी टंचाईच्या छायेत काढावे लागणार का, अशी चिंता पडली आहे.
Crime in Wardha : रशियातील विद्यापीठात प्रवेश करून देतो म्हणून उकळले पैसे!
पाण्याची टंचाई पाहता गतवर्षी जिल्हा प्रशासनाने आठही तालुक्यात ५३ खासगी विहिरी ताब्यात घेऊन नागरिकांना पाणीपुरवठा केला होता. तीच परिस्थिती यावर्षी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. धाम प्रकल्पातून शहर व आसपासच्या १३ ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा केला जातो. जिल्ह्यात रब्बी हंगामात अनेक शेतकरी पिके घेत असतात. नंतर काही शेतकरी भुईमूग व अन्य उन्हाळी पिके घेतात. पण जिल्ह्यातील जलाशय फेब्रुवारी महिन्यातच अर्धे खाली झाल्यासारखे आहेत.
त्यामुळे यावर्षी उन्हाळी पिकांना पाणी वेळेवर मिळण्याची कमी शक्यता आहे. तसेच पाण्याची पातळी खाली जाऊन विहीर व बोअर कोरडे पडण्याची भीती शेतकऱ्याकडून वर्तवली जात आहे. सध्या धाम प्रकल्पात ४७, पोथरा १४, पंचधारा ३३, डोंगरगाव ५१, मदना ४५, मदन उन्नई धरण ५३, लाल नाला ५५, वर्धा कार नदी प्रकल्प ३१, सुकळी लघू प्रकल्पात २४ टक्के पाणी शिल्लक आहे.