CM Devendra Fadnavis must Keep the promise of loan waiver : माजी गृहमंत्र्यांची मागणी, शेतकऱ्यांना सातबारा कोरा करण्याचे आश्वासन
Akola विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. मात्र, चार महिने उलटूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिलेला शब्द प्रामाणिकपणे पाळावा, अशी मागणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली.
शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच ‘ईव्हीएम’ विरोधात राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. देशमुख म्हणाले, “राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत. मात्र, त्याकडे लक्ष न देता औरंगजेबच्या कबरीचा मुद्दा पुढे आणून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे खरे प्रश्न दुर्लक्षित राहात आहेत.”
Pravin Datke : महीला पोलिस कर्मचाऱ्याचे कपडे फाडण्याचा प्रयत्न !
नागपूर येथे घडलेली घटना दुर्दैवी असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले, “नागपूरकरांनी दाखविलेला संयम महत्त्वाचा ठरला असून त्यामुळे शहरातील परिस्थिती नियंत्रणात आली आहे.” “राज्य सरकारमधील मंत्री नितेश राणे यांनी केलेली वादग्रस्त विधाने समाजात तेढ निर्माण करत आहेत. त्यामुळे राज्यातील वातावरण दूषित होत असून मुख्यमंत्री याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे,” अशी मागणी देशमुख यांनी केली.
“राज्यात पोलिसांना गुन्हेगारांचे संरक्षण मिळत असल्यामुळे कायदा-सुव्यवस्थेची स्थिती ढासळली आहे. महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दिवसाढवळ्या हत्या होत आहेत. नागपुरातच तीन दिवसांत चार हत्यांचे प्रकार घडले आहेत,” असा गंभीर आरोप माजी गृहमंत्री देशमुख यांनी केला. देशमुख पुढे म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी सरकारमधील मंत्र्यांना तंबी द्यावी. जर सरकार औरंगजेबाची कबर खोदून काढणार नसेल, तर बजरंग दल ते काम करेल, अशी विधाने केली जात आहेत. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.”
“मी गृहमंत्री असताना बीडमध्ये नुकत्याच घडलेल्या घटनांसारखे प्रकार होऊ दिले नाहीत. मात्र, सध्या सरकार निष्क्रिय असल्यामुळे बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे आणि माधव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपी अद्याप फरार आहेत. ही सरकारची अपयश आहे,” असे देशमुख म्हणाले. “त्यावेळी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी बीडचे एसपी बदलण्यासाठी दबाव टाकला होता. त्यांनी याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रारही केली होती,” असा गौप्यस्फोट त्यांनी केला.
Yogesh Sagar : विधानसभेत गाजली HSRP, वेबसाईटमधून सरकारचा सायबर फ्रॉड !
“ईव्हीएममध्ये छेडछाड, बनावट मतदार याद्या, बनावट ‘एपी’ कार्ड यासारख्या गैरप्रकारांमुळे विधानसभा निवडणुकीत मोठा घोळ झाला आहे. त्याचाच परिणाम म्हणजे गेल्या चार महिन्यांपूर्वी स्थापन झालेले हे सरकार बनावट असल्याचा आरोप मी करत आहे,” असे देशमुख म्हणाले. यावेळी ज्येष्ठ नेते राजेंद्र शिंगणे, डॉ. संतोष कोरपे, जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, शहराध्यक्ष रफिक सिद्दीकी, पक्ष निरीक्षक गणेश रॉय, डॉ. आशा मिरगे, राजू बोचे, माजी नगरसेवक पंकज गावंडे आदी उपस्थित होते.